उत्तराखंडमध्ये अनेकदा पूर परिस्थिती निर्माण होते. गेल्या काही वर्षांत येथे अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितींचा पूर्वअंदाज यावा यासाठी उत्तराखंड सरकारने तज्ज्ञांच्या दोन गटांची स्थापना केली. हे तज्ज्ञ उत्तराखंडमधील पाच संभाव्य धोकादायक हिमनदी तलावांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याचे मूल्यांकन करतात. हे तलाव हिमालयीन राज्यांमध्ये अलीकडच्या वर्षांत अनेक आपत्तींसाठी कारणीभूत ठरले आहेत. त्यामुळे हे तलाव ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड्स (GLOF) प्रवण क्षेत्रात येतात. ग्लोफ (GLOF) म्हणजे काय? ग्लोफची परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे का? केदारनाथसारखा प्रलय पुन्हा येऊ शकतो का? जाणून घेऊ या.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) हिमालयीन राज्यांमध्ये १८८ धोकादायक हिमनदी सरोवरांची नोंद केली आहे; जी अतिवृष्टीमुळे फुटू शकतात. त्यापैकी १३ सरोवरे/ तलाव उत्तराखंडमध्ये आहेत. भारतासह जगभरातील पृष्ठभागाच्या वाढत्या तापमानामुळे ‘ग्लोफ’चा धोका वाढला आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सुमारे १५ दशलक्ष लोकांना हिमनदी सरोवरांपासून धोका आहे आणि हा धोका ग्लोबल वॉर्मिंगमुळे दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हिमनदी वितळत असल्याने सरोवरांची संख्यादेखील वाढत आहे.

ग्लोफ म्हणजे काय?

ग्लेशियर वितळल्यामुळे छोट्या-मोठ्या आकाराचे तलाव तयार होतात. या तलावांमध्ये हिमनदीतून बर्फ आणि पाणी वाहून येत असल्याने या तलावांचा आकार वाढत जातो. ग्लेशियरचा आकार जसजसा कमी होत जातो, तसे तलाव मोठमोठे होऊ लागतात. तलाव जितका मोठा, तितका धोका जास्त असतो. हे तलाव सहसा सैल खडक, दगडधोंडे आणि गाळाने तयार झालेले असतात. पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यास किंवा भूस्खलन झाल्यास तलावाच्या सभोवतालची सीमा तुटते आणि पर्वतांच्या खालच्या बाजूने प्रचंड प्रमाणात पाणी वाहू लागते; ज्यामुळे पर्वतीय भागात असलेल्या गावांमध्ये पूर येऊ शकतो. यालाच ‘ग्लोफ’ म्हणून संबोधले जाते.

१५ दशलक्ष लोकांना हिमनदी सरोवरांपासून धोका आहे आणि हा धोका ग्लोबल वॉर्मिंगमुळे दिवसेंदिवस वाढत चालला आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : मतदानावर होणार उष्णतेच्या लाटेचा परिणाम? हवामान विभागाने दिला धोक्याचा इशारा

‘ग्लोफ’सारखी परिस्थिती अनेक कारणांमुळे निर्माण होऊ शकते. हिमनदीतील बर्फाचे तुकडे मोठ्या प्रमाणात वाहून सरोवरात गेल्यास, पाण्याच्या पातळीत होणारी वाढ, हिमस्खलन किंवा भूस्खलन यांसारख्या घटना किंवा मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. नैसर्गिकरीत्या तयार झालेले हे तलाव फुटतात; ज्यामुळे तलावातील सर्व पाणी वेगात खालच्या दिशेने वाहत येते. ही गंभीर परिस्थिती धरणफुटीसारखी असते.

‘ग्लोफ’सारख्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात पाण्यासह गाळ आणि मातीचे ढिगारेही वेगाने वाहून येतात. पुराच्या या पाण्यामुळे रस्ते, पूल व इमारती यांसारख्या पायाभूत सुविधा नष्ट होऊ शकतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते.

‘ग्लोफ’च्या दुर्घटनांमध्ये वाढ

अलीकडच्या वर्षांत हिमालयीन प्रदेशात ‘ग्लोफ’च्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. जागतिक तापमान वाढल्याने हिमनदी वितळण्याचे प्रमाणही वाढले आहे. पायाभूत सुविधांच्या विकासामुळेही अशा दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. १९८० पासून हिमालयीन प्रदेशात, विशेषत: आग्नेय तिबेट आणि चीन-नेपाळ सीमाभागात ‘ग्लोफ’सारखी स्थिती वारंवार निर्माण होत आहे.

एका अभ्यासानुसार, पर्वतीय भागांमध्ये पायाभूत सुविधा, बांधकामामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. हा अभ्यास २०२३ मध्ये चीनमधील तिबेट पठार संशोधन संस्थेतील जर्नल नेचर, ताईगंग झांग, वेईकाई वांग, बाओशेंग एन व लेले वेई यांनी केला होता. “अंदाजे ६,३३५ चौरस किमी जमीन ‘ग्लोफ’मुळे धोक्यात येऊ शकते. ५५,८०८ इमारती, १०५ जलविद्युत प्रकल्प, १९४ चौरस किमी शेतजमीन, ५,००५ किमी रस्ते व ४,०३८ पुलांना धोका निर्माण होऊ शकतो,” असे या अभ्यासात सांगण्यात आले आहे.

फेब्रुवारी २०२३ मध्ये ‘जर्नल नेचर’मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासातील, ‘ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड्स थ्रेटन मिलियन्स ग्लोबली’ या विश्लेषणात सांगण्यात आले आहे की, भारतातील सुमारे तीन दशलक्ष आणि पाकिस्तानमधील दोन दशलक्ष लोकांना ‘ग्लोफ’च्या परिस्थितीचा सामना करावा लागतो.

उत्तराखंडमध्ये १३ हिमनदी सरोवरे आहेत; जी ग्लोफप्रवण क्षेत्रात आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

“या भागात (भारत आणि पाकिस्तान) हिमनदी तलावांची संख्या आणि आकार पॅसिफिक नॉर्थवेस्टमध्ये असणार्‍या किंवा तिबेटमध्ये असणार्‍या तलावांसारखा मोठा नाही. परंतु, भारत आणि पाकिस्तानमध्ये लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे इथे धोकाही जास्त आहे,” असे अभ्यासाचे सह-लेखक व कँटरबरी विद्यापीठातील प्राध्यापक टॉम रॉबिन्सन यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

उत्तराखंडमध्ये काय परिस्थिती?

उत्तराखंडने गेल्या काही वर्षांत दोन मोठ्या ‘ग्लोफ’च्या घटना घडल्या आहेत. पहिली दुर्घटना जून २०१३ मध्ये घडली. या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला होता. केदारनाथ खोऱ्याला या पुराचा सर्वांत जास्त फटका बसला होता. या दुर्घटनेत हजारो लोकांचा मृत्यू झाला. दुसरी दुर्घटना फेब्रुवारी २०२१ मध्ये घडली, जेव्हा चमोली जिल्ह्यातील तलाव फुटल्यामुळे अचानक पूर आला.

हेही वाचा : Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?

उत्तराखंडमध्ये १३ हिमनदी सरोवरे आहेत; जी ग्लोफप्रवण क्षेत्रात आहेत. विविध तांत्रिक संस्थांकडून उपलब्ध डेटा आणि संशोधनाच्या आधारावर, या तलावांच्या धोकादायक स्थितीचे अ, ब व क अशा तीन स्तरांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. पाच अतिसंवेदनशील हिमनदी तलाव ‘अ’ वर्गात मोडतात. त्यामध्ये चमोली जिल्ह्यातील धौलीगंगा खोऱ्यातील वसुधरा ताल व पिथौरागढ जिल्ह्यातील चार तलावांचा समावेश आहे. या चार तलावांमध्ये लसार यांगटी खोऱ्यातील माबान तलाव, दरमा खोऱ्यातील प्युंगरू तलाव, दरमा खोऱ्यातील आणखी एक अवर्गीकृत तलाव व कुठी यांगती खोऱ्यातील तलावाचा समावेश आहे. या पाच तलावांचे क्षेत्रफळ ०.०२ ते ०.५० चौरस किमी आहे. पृष्ठभागाच्या वाढत्या तापमानामुळे उत्तराखंडमधील परिस्थिती आणखी बिघडू शकते. २०२१ ते २०२५ दरम्यान राज्याचे वार्षिक सरासरी कमाल तापमान १.६ ते १.९ अंश सेल्सिअसने वाढू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.