Jallianwala Bagh Massacre Day जालियनवाला बाग हत्याकांडाच्या रक्तरंजित इतिहासाला आज १०५ वर्षं पूर्ण झाली. कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या कवितेतील काही ओळी या दुर्घटनेचं भयाण वास्तव दर्शवितात….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकांत
जगजेत्यांच्या पराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !
पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशिल देवा, तू अपुले खास;
असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !

१३ एप्रिल १९१९ रोजी घडलेल्या या अमानुष दुर्घटनेनं पंजाबसह संपूर्ण देश हादरला होता. अमृतसरमध्ये घडलेली ही दुर्घटना म्हणजे ब्रिटिशांच्या क्रूरतेचा कळस होता. आजही त्याचे दुखरे व्रण लोकांच्या मनावर आहेत. या दुर्घटनेच्या खुणा आजही जालियनवाला बागेत पाहायला मिळतात. इतिहासकार सांगतात की, जालियनवाला बाग हत्याकांडानंतरच भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक नवी दिशा आणि भारतीयांना एकत्रित येऊन लढण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्या दिवशी नक्की काय घडलं होतं? जनरल डायर कोण होता? त्यानं भारतीयांवर गोळीबार करण्याचा आदेश का दिला? या दुर्घटनेचा काय परिणाम झाला? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

रेजिनाल्ड एडवर्ड हॅरी डायर नावाच्या ब्रिटिश कर्नलनं आपल्या सैन्याला अमृतसरमधील जालियनवाला बागेला घेरून, जमावावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. जमलेल्या पुरुष, स्त्रिया व मुलांवर त्याच्या सैन्यानं अंदाधुंद गोळीबार सुरू केला. गोळीबार सुरू झाल्यानंतर लोक सैरावैरा पळू लागले. त्या गोळ्यांच्या तावडीत सापडू नये यासाठी काहींनी आवारातच असलेल्या विहिरीत उड्या मारल्या. ब्रिटिशांच्या म्हणण्यानुसार, या गोळीबारात सुमारे ४०० लोक मारले गेले; ज्यात बालक आणि वृद्धांचाही समावेश होता. परंतु, भारतीय इतिहासकारांनुसार, या हत्याकांडात हजारो निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावले. भारतात ब्रिटिश राजवटीनं जालियनवाला बाग हत्याकांडाच्या पूर्वी आणि नंतरही असंख्य अत्याचार केले. नि:शस्त्र नागरिकांवर होत असलेल्या हिंसाचारामुळे ब्रिटिश सरकारविरोधातील निषेधानं तीव्र स्वरूप धारण केलं.

१३ एप्रिल १९१९ रोजी घडलेल्या या अमानुष दुर्घटनेनं पंजाबसह संपूर्ण देश हादरला होता. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

त्या दिवशी नक्की काय घडले?

१३ एप्रिल रोजी शीख समुदायाचा महत्त्वपूर्ण सण असलेल्या बैसाखीचा दिवस होता. त्या काळात ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्याची चळवळ सातत्यानं जोर धरत होती. रौलेट कायद्याविरुद्ध देशभरात अनेक ठिकाणी निषेध आंदोलनं सुरू होती. जालियनवाला बाग येथेदेखील एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रौलेट कायदा हा एक असा कायदा होता; ज्याद्वारे पोलिस कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करू शकत होते. या कायद्यांतर्गत प्रांतीय सरकारांना वॉरंट जारी न करता, कोणालाही अटक करण्याचा अधिकार देण्यात आला होता. निवडून आलेल्या भारतीय प्रतिनिधींच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून, हा कायदा विधान परिषदेच्या माध्यमातून पुढे ढकलण्यात आला; ज्यामुळे भारतीयांमध्ये नाराजी पसरली. दिल्ली, बॉम्बे (आताची मुंबई) व लाहोर या शहरांमध्येही काही हिंसक निदर्शनं झाली होती. महात्मा गांधींनीही या कायद्याविरुद्ध शांततापूर्ण सत्याग्रह करण्याचं आवाहन केलं होतं.

हेही वाचा : जालियनवाला हत्याकांडाबाबत ब्रिटिश उच्चायुक्तांकडून खेद

११ एप्रिल रोजी गव्हर्नर मायकल ओ’डॉयर यांनी लाहोर व अमृतसरमध्ये मार्शल राजवट लागू केली. परंतु, अमृतसरला हा आदेश १४ एप्रिलला पोहोचला. गव्हर्नर मायकल ओ’डॉयर यांनी जालंधर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे लष्करी अधिकारी जनरल डायर याला जालंधर छावणीतून अमृतसरला पाठवलं. मार्शल लॉमुळे चार किंवा जास्त जणांना एकत्र जमण्यास मनाई होती. १३ एप्रिल रोजी जनरल डायरच्या सैन्यानं शहरात फेरी मारत चारहून अधिक लोकांच्या संमेलनाविरुद्ध इशारा दिला. परंतु, ही घोषणा बहुतेक लोकांपर्यंत पोहोचलीच नाही आणि बैसाखीनिमित्त अनेक भाविक सुवर्ण मंदिराकडे निघाले. रौलेट कायद्याला विरोध करणाऱ्या डॉ. सत्यपाल व डॉ. सैफुद्दीन किचलू या दोन स्वातंत्र्यवीरांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांच्या अटकेच्या विरोधात दुपारी ४ वाजेपर्यंत अनेक जण जाहीर सभेसाठी जालियनवाला बाग येथे जमले होते.

अमृतसरमध्ये घडलेली ही दुर्घटना म्हणजे ब्रिटिशांच्या क्रूरतेचा कळस होता. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

क्षणाचाही विलंब न करता गोळीबार

जालियनवाला बागेत लोक जमा झाल्याची बातमी जनरल डायरपर्यंत पोहोचली. डायरनं ही सभा म्हणजे सरकारी आदेशांचं उल्लंघन मानलं. “मी माझ्या मनाची तयारी केली होती. मी हे करू की नको, असाच विचार करीत होतो; पण परिस्थिती खूप गंभीर होती”, असं डायरनं १९२० च्या हंटर कमिटीला (ज्याला डिसऑर्डर चौकशी समिती, असंही म्हटले जातं) सांगितलं. ही कमिटी शहरांमधील अशांततेबाबतची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. त्यात डायरच्या कृतींवर चर्चा करणारा एक विशिष्ट विभाग होता.

आपल्या सैन्यासह डायरनं एका अरुंद गल्लीतून बागेत प्रवेश केला. या बागेत प्रवेश करण्याचा आणि बाहेर जाण्याचा हा एकमेव मार्ग होता. १९२० च्या अहवालात असं नमूद केलं गेलंय की, डायरनं २० गोरखा सैनिक आणि २५ बलुच सैनिकांसह जालियनवाला बागेत प्रवेश केला. त्यावेळी तिथे सुमारे १० ते १२ हजार लोक जमले होते. “त्याच्या घोषणेचं उल्लंघन म्हणून जमलेल्या लोकांना कोणताही इशारा न देता, त्यानं आपल्या सैन्याला गोळीबार करण्याचे आदेश दिले. हा गोळीबार सुमारे १० मिनिटं सुरू राहिला,” असे अहवालात म्हटले आहे. जमावाकडे कोणतीही शस्त्रं नव्हती; परंतु काही जण लाठ्या घेऊन आले असावेत, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

दुर्घटनेच्या खुणा आजही जालियनवाला बागेत पाहायला मिळतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

सैनिकांनी क्षणाचाही विलंब न करता, आपापल्या जागा घेतल्या आणि डायरनं फायर म्हणताच अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सैनिकांनी एकूण १,६५० राऊंड फायर केले. बंदूक रिकामी झाली की, ती ‘रीलोड’ करून पुन्हा फायरिंग केली गेली. लोक सैरावैरा पळू लागले. सैनिक अचूक वेध घेऊन लोकांवर गोळीबार करीत होते. लोकांच्या बाहेर पडण्याचा एकमेव मार्गही ब्रिटिश सैन्यानं रोखून धरला होता. तपासात मृतांचा आकडा ३७९ असल्याचं सांगण्यात आलं; मात्र जखमींचा आकडा देण्यात आला नाही. जखमी लोक मृतांच्या तिप्पट असावेत, असा अंदाज केला गेला. भारतीय नेत्यांनी या हत्याकांडाच्या प्रत्युत्तरादाखल संताप व्यक्त करून, जोरदार निषेध केला. उल्लेखनीय म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते कवी रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारकडून मिळालेल्या ‘नाइटहूड’ या किताबाचा त्याग केला.

जनरल डायर कोण होता?

डायरचा जन्म १८५४ मध्ये सध्याच्या पाकिस्तानमधील मुरी येथे झाला. १८८५ मध्ये त्याची वेस्ट सरे रेजिमेंटमध्ये नियुक्ती झाली होती आणि त्यानंतर त्याची भारतीय सैन्यात बदली झाली. त्यानं म्यानमारमध्ये १८८६-८७ मध्ये मोहीम चालवली आणि युरोपात झालेल्या पहिल्या महायुद्धात (१९१४-१८) भाग घेतला. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे त्याच्या कृतींवर विशेष लक्ष केंद्रित झालं. या दुर्घटनेनंतरही डायरची भारतीयांविरुद्धची क्रूरता सुरूच होती. १५ एप्रिल रोजी त्यानं अमृतसरमध्ये लष्करी कायदा लागू केला.

१० एप्रिल १९१९ रोजी मार्सेला शेरवूड या मिशनरी अमृतसरच्या रस्त्यावर सायकल चालवत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. काही स्थानिकांनी मध्यस्थी करून त्यांना वाचवलं. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर सहा दिवसांनी शेरवूड यांच्यावर हल्ला कसा झाला याची माहिती डायरला मिळाली आणि त्यानं आदेश जारी केला की, शेरवूड यांच्यावर हल्ला झालेल्या रस्त्यावरून कोणीही फिरकणार नाही. त्या रस्त्यावरून जायचं असल्यास सरपटत जावं लागेल. या आदेशाचं उल्लंघन केल्यास चाबकाचे फटके दिले जातील, असं सांगण्यात आलं.

रेजिनाल्ड एडवर्ड हॅरी डायर (छायाचित्र-विकिपीडिया)

डायरला दुष्कृत्याबद्दल नव्हता तसूभरही खेद

हंटर कमिटीच्या अहवालाचा एक भाग म्हणून डायरनं केलेली विधानं असं दर्शवितात की, त्यानं १३ एप्रिल रोजी केलेल्या दुष्कृत्याबद्दल त्याला तसूभरही खेद नव्हता. “मी माझ्या मनाची तयारी केली होती. मी हे करू की नको, असाच विचार करीत होतो. परिस्थिती खूप गंभीर होती. मी मनाशी ठरवलं होतं की, सभा सुरू ठेवल्यास मी सर्व लोकांना गोळ्या घालून ठार मारीन.” त्यानं इतक्या ताकदीचा वापर का केला, असा प्रश्न केला असता, तो म्हणाला, “होय, मला असं वाटतं की, कदाचित मी त्यांना गोळीबार न करताही पांगवू शकलो असतो; पण मला त्यांना शिक्षा करायची होती. सभा न घेण्याचा निर्णय घेतला असता, तरीही मी सर्वांना शिक्षा केलीच असती”, असं तो म्हणाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय.

हेही वाचा : १०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?

या दुर्घटनेनंतर भारतीय पेटून उठले. जगभरात त्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. जनरल डायरनं निरपराध महिला, मुलं, वृद्ध यांची हत्या करून माणुसकीला काळिमा फासणारं दुष्कृत्य केलं होतं. आज या भीषण हत्याकांडाला १०५ वर्षं पूर्ण झाली. आजही त्या गोळ्या, ते घाव, त्या सर्व दु:खदायी काळ्या आठवणी देश विसरू शकलेला नाही. पंजाबच्या जालियनवाला बागेमध्ये स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या त्या भारतीयांचं स्मारक उभारण्यात आलं आहे; जिथे स्वातंत्र्यज्योत तेवते आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jallianwala bagh massacre history 105 years rac
First published on: 13-04-2024 at 09:07 IST