दरवर्षी आपण मोठ्या आतुरतेनं गणेशोत्सवाची वाट पाहत असतो. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घराघरांत लाडक्या बाप्पाचं आगमन होतं. गणपतीच्या आगमनानं साऱ्या वातावरणात एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या या बाप्पाची जो तो आपापल्यापरिनं दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवस सेवा करतो. बहुतेक घरगुती गणेश मूर्तीचं विसर्जन हे दीड दिवसांनी होतं. तर अनेकांकडे पाच किंवा सात दिवस बाप्पा मुक्कामाला असतो. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ राज्यात तर केवळ एका दिवसासाठी बाप्पांचं आगमन होतं. सकाळी गणपतीचे आवाहन करून संध्याकाळी विसर्जन केले जाते. यामागच्या परंपरा वेगळ्या आहेत. प्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसांनी मूर्तीचं विसर्जन करण्यामागे काही ठोस असे संदर्भ नाहीत. लोक आपल्या आनंद आणि समाधानासाठी बाप्पाची पाच दिवस मनोभावे सेवा करतात. चतुर्थीच्या सणाला नातेवाईक, मित्रपरिवार एकत्र येतात. वर्षभर दुरावलेलं कुटुंब या निमित्तानं जवळ येतं. तेव्हा हा आनंद अधिक द्विगुणित व्हावा, सारं कुटुंब त्याच्या निमित्तानं एकत्र यावं या उद्देशानं अनेक कुटुंबांनी मूर्ती विसर्जनाचे दिवस वाढवले. आणि अशाप्रकारे दीडवरुन पाच, सात दिवस गणेशोत्सव साजरा केला जाऊ लागला. जसं गोव्यात किंवा दक्षिणेकडे दीड दिवसांनी गणेश मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा आहे तशी सांगलीमध्ये पाच दिवसांनी गणेश मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा आहे. सांगली संस्थानचे तत्कालीन राजे पटवर्धन सरकार पाच दिवसांनी राजवाड्यातील गणेश मूर्तीचं विसर्जन करायचे. तेव्हा राजाचे अनुकरण करत प्रजेने देखील पाच दिवसांनंतर मूर्ती विसर्जन करण्याची परंपरा सुरू केली.