वीस वर्षांची शलाका वैद्यकीय महाविद्यालयात शिकते. दरवर्षी परीक्षेच्या वेळी तिचे हात सुजतात आणि पुरळ येते. त्यामुळे परीक्षेत लिहायला तिला त्रास होतो. जास्त क्षमतेची औषधे दिल्यावरच तिला गुण येतो. ‘परीक्षेचा तिला अजिबात ताण नाही, ती खूप हुशार आहे आणि तिची तयारीही योग्य आहे. उलट हातावरच्या पुळ्यांचाच तिला त्रास होतो, त्या गेल्या तर ती व्यवस्थित होईल, आम्ही अजून चांगल्या त्वचारोगतज्ज्ञांना दाखवू’ असे तिचे वडील म्हणाले आणि मानसिक तपासणीसाठी नकार दिला. मानसिक आजारात दिसणारी शारीरिक लक्षणे मन आणि शरीर एकमेकांपासून वेगळे असतात हा समज चुकीचा आहे. एकमेकांवर अवलंबून अवयवांचे काम होत असते. त्यातून मेंदूची भूमिका सर्वात महत्त्वाची. प्रत्येक अवयव मेंदूशी जोडलेला असते. श्वास, हृदयाचे ठोके, आतडीची हालचाल या आपल्या अजाणता होत असलेल्या क्रियाही मेंदूच्या देखरेखीत केल्या जातात. त्यामुळे मनाचे म्हणजेच मेंदूचे आजार झाले तर त्याची काही शारीरिक लक्षणे दिसतातच. काही व्यक्तींचे लक्ष आपल्या शरीराच्या अडचणीकडे जास्त वेधले जाते. त्यामुळे ही परिस्थिती मुळात त्या अवयवाच्या आजाराची आहे, असा निष्कर्ष निघतो. मानसिक असामंजस्य आणि शारीरिक त्रास साधारण एकाच वेळेला सुरू होतात, त्यामुळे शारीरिक आजाराचा ताण आहे, असे वाटते. दुसरे म्हणजे मनाचा त्रास सांगायला लाज आणि कमीपणा वाटतो, त्यामुळे शरीराचे त्रास आधी सांगण्याकडे कल असतो. त्यानंतर तपासण्या आणि उपचार यातून काही निष्पन्न होत नाही. मात्र मानसिक त्रासाची शक्यता सुचवली तर व्यक्तीला पटत नाही. यामुळे त्यांना वारंवार डॉक्टर बदलावे लागतात. कोणती लक्षणे असू शकतात? व्यक्तिगणिक लक्षणे बदलतात. काही व्यक्तींना पचनक्रियेबद्दल जास्त त्रास होतो. या व्यक्तींना ढेकर येणे, छातीत जळजळ, पोटात ढवळणे- गच्च होणे, मळमळणे, उलटी होणे, पोट साफ न होणे किंवा त्याउलट जुलाब होणे यातील काही किंवा सर्व त्रास होतात. तसेच हृदयरोग, त्वचारोग, स्त्रीरोग, श्वासाचे त्रास आणि इतर सर्व प्रकारची लक्षणे येऊ शकतात. काही व्यक्तींचे अंग दुखते आणि थकवा वाटतो; बहुतेक साथीच्या तापानंतर याची सुरुवात होते. एखाद्या अवयवाचा आजार नाही असे तपासणीतून समजल्यावर थोडे दिवस रुग्णाला बरे वाटते. नंतर दुसऱ्या अवयवाचे त्रास सुरू होतात. आजाराची भीती आणि आजाराचा भ्रम हे आणखीन दोन प्रकार आहेत. कुठलातरी गंभीर अथवा नुकताच प्रसिद्ध झालेला आजार आपल्याला झाला आहे, अशी भीती मनात बसते. हा आजार काही वेळेला कर्करोग, काही वेळेला एचआयव्ही तर काही वेळेला इबोला असतो. त्याच्या तापासण्या केल्या जातात आणि तपासण्यात काही मिळाले नाही तरीही भीती राहते. याच्या पुढचे पाऊल म्हणजे अमका आजार झालेलाच आहे म्हणून इतकी खात्री पटते की डॉक्टर आणि तपासणीचे यंत्रच अयोग्य आहे असे वाटते- हा एक भ्रम असतो. उपचार मानसिक आजारामधील होणाऱ्या शारीरिक त्रासाचे स्वरूप वैशिष्टय़पूर्ण असते. शारीरिक तपासण्यांमध्ये फारसे काही आढळत नाही. शारीरिक लक्षणांवर उपचार केल्याने अर्धवट किंवा काहीही गुण येत नाही. त्याशिवाय व्यक्तीच्या वागण्यात नकारात्मक बदल होतो. ही सर्व मानसिक आजारातून झालेल्या शारीरिक त्रासाची लक्षणे असतात. शिवाय मानसिक आजाराची लक्षणे दिसतच असतात. ही लक्षणे शारीरिक आजाराच्या ताणतणावामुळे आहेत अशी गल्लत केल्याने आजार कळत नाही. मानसशास्त्रीय तपासण्यांमध्ये हे निदान कळून येते. संशोधनामधील मेंदूच्या तपासण्यांमध्ये ह्या व्यक्तींच्या मेंदूतल्या रक्त पुरवठय़ाची संरचना बदललेली दिसून येते. मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी तयार करणे हा या आजाराचा अध्र्यापेक्षा जास्त उपचार असतो. या उपचारात औषध-गोळ्यांचे प्रमाण कमी आणि समुपदेशन जास्त असते. कमी कालावधीचा आजार लवकर बरा होतो. नराश्य, भ्रम असे मानसिक आजार असतील तर शारीरिक त्रास उपचाराने पटकन बरे होतात. दीर्घ काळाचा आजार बरा करणे कठीण असते, पण रुग्णाचा त्रास कमीतकमी करणे शक्य असते. तुम्हाला काहीही झालेले नाही. विचार करू नका, अशी सूचना करण्याआधी तुम्ही विचार करा. खरंतर ही व्यक्ती आजारी असते. तिला समजून न घेतल्याने ती एकटी पडते. अशा व्यक्तींना आधार द्या आणि उपचारसाठी प्रवृत्त करा.