रुबी पूर्वी हसतमुख, प्रत्येक गोष्टीत रस घेणारी आणि उत्साही होती. मात्र गेल्या दहा वर्षांत अगदी निरुत्साही, अशक्त झाली. तिचे तिलाच कळत होते की दहा वर्षांत तिला यातून बाहेर पडता यायला हवे होते. तिच्या खूप तपासण्या केल्या पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. दर वर्षी एक नवीन प्रकारची थेरपी शोधून त्यातून बरे होण्याचा प्रयत्न करणे हे तिचे एक करियरच बनून गेले होते.

नैराश्याची कारणे
१५ ते ३० टक्के व्यक्तींना कधी ना कधी हा आजार होतोच. पौगंडावस्थेनंतर पुरुषांपेक्षा दुपटीने स्त्रियांना हा आजार होतो. लहानपणी झालेल्या त्रासामुळे मेंदुच्या हिपोकॅम्पस भागाचा विकास खुंटतो. काही कुटुंबांमध्ये अनुवंशिकता असते. वेगवेगळ्या आजारांमुळेही मेंदूचे आरोग्य बिघडून नैराश्य येते. मेंदूतील द्रव्यांचे संतुलन बिघडल्यामुळे मनात उदासीनता निर्माण होते. विपरित परिस्थितीनेही हे संतुलन बिघडते. मग व्यक्तीचे लक्ष नुसत्या नकारात्मक विचारांकडे केंद्रित होवू लागते. त्यामुळे आणखीनच नैराश्य वाढू लागते. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूमध्ये ‘५ एचआयएए’ द्रव्याची कमतरता असते. मेंदूचे आरोग्य आणि बाहेरचे वातावरण या दोन्हींच्या एकत्रीकरणाने हा आजार होतो.

नैराश्याची लक्षणे
नैराश्यात सतत आणि तीव्र मानसिक दुख होते. मन बधीर, अस्वस्थ आणि असमाधानी असते. सारखे रडू येते, काही करावेसे वाटत नाही. यातून बाहेर पडण्यासाठी व्यक्ती नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करतात, धार्मिक होतात किंवा वारंवार सहलीला जातात. काही काळ थोडे बरे वाटते. त्यांची भूक आणि झोप कमी झाल्याचे लक्षात आल्यावर ते व्यायाम करतात, पथ्य पाळतात. वेग-वेगळ्या तपासण्या, थेरपीज, पथीची औषधे घेऊन बरे होण्याचा प्रयत्न करतात. काही व्यक्ती दारू किंवा झोपेच्या गोळ्या घेतात. शरीर आणि मन थकून जाते. या व्यक्ती निराश होतात त्यांना जगणे नकोसे वाटू लागते, आत्महत्येचे विचार येतात आणि काही व्यक्ती आत्महत्या करतात.   
सतत पलंगावर  ‘मला झोप होत नाही’ असे म्हणतात. – त्यामुळे काय समजावे हे घरच्यांना कळत नाही. काही समजवायला गेले तर ती व्यक्ती रडायला लागते किंवा चिडून भांडण करते. नैराश्यग्रस्त व्यक्तीला ‘आपले कुणी नाही’ असेच वाटत राहते. त्यांच्या मनात काय आहे, काहीतरी घडले काय हे शोधण्याचा घरचे प्रयत्न करतात. लहान मुल नैराश्यग्रस्त आईचे लक्ष आणि प्रेम मिळवण्यासाठी रडके किंवा धांदरट बनते. कामामध्ये लक्ष आणि एकाग्रता कमी झाल्यामुळे चुका होतात आणि गोष्टी विसरल्या जातात.
नैराश्य हा टप्प्याटप्प्यांमध्ये येणारा आजार आहे, त्याची लक्षणे कमी जास्त होत असतात. नैराश्याचा वेग आणि प्रमाण जास्त असले तर व्यक्तीमध्ये एकदम बदल होतात. पण ते कमी असले तर व्यक्तीतले बदल एवढे हळू होतात की तो आजारी आहे हे लक्षात येत नाही. मुळात क्षमता जास्त असेल तर तो आपल्या जबाबदाऱ्या पार पडत राहतो. अशा लोकांच्या वागण्याला स्वभावदोष समजले जावू शकते. व्यक्तीच्या जीवनात काही त्रासदायी गोष्ट चालू असेल तरीही त्याचे वागणे या त्रासामुळे आहे असा समज होतो. नैराश्यामधील शारीरिक लक्षणांना जास्त महत्त्व देवून शारीरिक उपचार, तपासण्या केल्या जातात. त्यातून काही निष्पन्न होत नाही. सापेक्ष तणाव हे नैराश्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

नैराश्यावरचे उपाय
एखाद्या जखमेएवढा सतत आणि तीव्र यातना देणारे पण कुणाला न दिसणारा हा आजार आहे. नैराश्य विसरावे, सहन करावे हा  गरसमज आहे. नैराश्यग्रस्त व्यक्तीही असा गरसमज करून घेतात. नैराश्यासाठी विशिष्ट औषधे असतात, ती परिणामकारी आणि सुरक्षित आहेत. नैराश्य हा दीर्घकाळाचा आजार असल्याने ही औषधे आयुष्यभर घ्यावी लागू शकतात. त्याला व्यसनाधीनता नाही तर आपल्या मेंदूची गरज समजावी. शरीरासाठी मधुमेह/ रक्तदाबाची औषधे आयुष्यभर घेणे योग्य पण मेंदूसाठी नैराश्यांवरील औषधे घेणे अयोग्य- हे चुकीचे तत्त्व पत्करू नये.   नैराश्यामध्ये समुपदेशनाचा खास उपयोग होतो. पण समुपदेशकांशी नुसत्या गप्पा मारून नैराश्य कमी होते हा सामान्यांचा खूप मोठा गरसमज आहे. समुपदेशन म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच असते, त्यात रुग्णाला मेहनत घ्यावी लागते. नैराश्याचे प्रमाण कमी असेल, योग्य प्रशिक्षित समुपदेशक उपलब्ध असेल आणि सांगितलेले बदल करण्याची रुग्णात क्षमता असेल तर समुपदेशनाचा चांगला उपयोग होतो. समुपदेशन डोळसपणे घ्यावे. नाही तर त्याचेही दुष्परिणाम होऊ शकतात. औषध आणि समुपदेशन, दोन्ही एकत्र घेणे योग्य. जगात माणसाला निकामी करणाऱ्या रोगानामध्ये हृदयविकारानंतर नैराश्याचा दुसरा क्रमांक आहे. नैराश्य गंभीर असले तरी उपचार करून बरे करण्यासारखे आहे, त्यामुळे काहीही करून नैराश्यापासून मुक्त होण्याचे प्रयत्न केले पाहिजे.
डॉ. वाणी कुल्हळी -vanibk@rediffmail.com