जगभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात येता यंदाच्या हंगामाची आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार की नाही याबद्दल शंका निर्माण झाली होती. परंतू स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागलं असतं. या कारणासाठी बीसीसीआयने युएईत स्पर्धेचं आयोजन केलं. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. युएईत करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आयपीएल सामन्यांना प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. अशावेळी खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी काही संघमालकांनी चाहत्यांच्या रेकॉर्डेड प्रतिक्रिया, टाळ्या, शिट्ट्या यांचं आयोजन करण्याचं ठरवलं आहे.

काही संघमालकांनी चिअरलिडर्सच्या फोर आणि सिक्स गेल्यानंतरच्या डान्स मूव्ह रेकॉर्ड करुन मैदानावर चालवण्याचं ठरवलंय. तसेच काही संघांनी चाहत्यांच्या प्रतिक्रिया, टाळ्या आणि शिट्ट्या रेकॉर्ड करुन मैदानात लावण्याचं ठरवलंय. यामुळे चाहत्यांनी आपण मैदानात हजर आहोत असं वाटेल आणि खेळाडूंनाही आपले चाहते आपल्यासोबत आहेत व ते आपला खेळ पाहत आहेत असं वाटेल. सध्याच्या घडीला खेळाडूंचा उत्साह आणि हुरुप वाढवण्यासाठी एवढचं करता येऊ शकतं. Business World शी बोलत असताना IPL च्या अधिकाऱ्याने माहिती दिली.

दरम्यान, प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयने Bio Secure Bubble तयार केलं आहे. प्रत्येक संघातील खेळाडू, त्यांचा परिवार यांना या Bio Secure Bubble चे नियम पाळणं गरजेचं आहे. तसेच करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी खेळाडूंना Bubble बाहेरील लोकांशी संपर्क साधता येणार नाहीये.

अवश्य वाचा – IPL : महेंद्रसिंह धोनी नव्हता CSK ची पहिली पसंती, ‘या’ खेळाडूला घेणार होते संघात