ट्रेंट बोल्ट आणि जयंत यादव यांच्या भेदक माऱ्यासमोर त्रेधातिरपीट उडालेल्या दिल्ली कॅपिटल्सचा डाव कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतने महत्वपूर्ण भागीदारी करत सावरला. ३ बाद २२ अशी परिस्थिती असताना पंत आणि अय्यर जोडीने संयमी फलंदाजी करत पडझड रोखली. मैदानावर स्थिरावल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला.

महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण हंगाम खराब कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या ऋषभ पंतने अंतिम सामन्यात संघाला निराश केलं नाही. मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत पंतने ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावा केल्या. यंदाच्या हंगामातलं हे त्याचं पहिलंच अर्धशतक ठरलं आहे.