अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता

व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्थांच्या ढासळत चाललेल्या डोलाऱ्याला आता ‘इंटिग्रेटेड एमबीए’ अभ्यासक्रमाचा आधार मिळण्याची शक्यता आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा (एमबीए) पर्याय आता बारावीनंतरही उपलब्ध होऊ शकणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने येत्या शैक्षणिक वर्षांपासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे.

आता बारावीनंतरही थेट एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा पर्याय परिषदेने उपलब्ध करून दिला आहे. ‘इंटिग्रेटेड एमबीए’ अशा नव्या अभ्यासक्रमाला परिषदेने मान्यता दिली असून बारावीनंतर पाच वर्षांचा हा अभ्यासक्रम असणार आहे. परिषदेने शिक्षणसंस्थांच्या मान्यता प्रक्रियेची नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये या अभ्यासक्रमाचे तपशील देण्यात आले आहेत. बारावीला किमान ४५ टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकणार आहे. मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाप्रमाणे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याबाबत कोणताही उल्लेख या नियमावलीत नाही. ६० विद्यार्थ्यांच्या एका तुकडीत विज्ञान, कला, वाणिज्य शाखेतील प्रत्येकी २० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. एमबीए प्रमाणेच एमसीए अभ्यासक्रमाचा पर्यायही बारावीनंतर उपलब्ध होणार आहे. मात्र त्यासाठी बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र विषयांत किमान ४५ गुण मिळणे आवश्यक आहे.

गेली अनेक वर्षे व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद घटत चालला आहे. त्यातच या संस्थांमध्ये चालणारे व्यवस्थापनाचे इतर अभ्यासक्रमही बंद करण्यात आल्यामुळे अनेक संस्थांची स्थिती डबघाईला आली होती. मात्र आता या संस्थांना ‘इंटिग्रेटेड एमबीए’ अभ्यासक्रमाचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. ज्या संस्थांमध्ये मुळात एमबीए अभ्यासक्रम चालवला जातो, त्याच संस्थांना इंटिग्रेटेड एमबीए सुरू करता येणार आहे. त्यामुळे या संस्थांचे अर्थकारण सावरण्यासाठीही मदत होऊ शकणार आहे.

  • बारावीनंतर ‘इंटिग्रेटेड एमबीए’ हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम
  • बारावी पास विद्यार्थ्यांना थेट एमबीएला प्रवेश
  • बारावीनंतर एमबीएप्रमाणेच एमसीए अभ्यासक्रमाचा पर्यायही उपलब्ध
  • मात्र, त्यासाठी बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र विषयांत किमान ४५ गुण आवश्यक
  • संस्थांना ‘इंटिग्रेटेड एमबीए’ अभ्यासक्रमाचा आणखी एक पर्याय उपलब्ध