चप्पल कोल्हापुरीच.. पण तिला असे स्वरूप द्या की ती पाहताक्षणी तुम्ही म्हणाल ती किंमत मोजून देश-विदेशातील ग्राहक पटकन खरेदी करेल. अर्थात, यासाठी गरज आहे ती चप्पल व्यवसायाला स्पर्धात्मक बनवून ग्राहकांच्या मागणीनुसार बनवण्याची. त्यासाठी चपलांमध्ये नावीन्य, सुलभ वापर, फॅशन आणि उत्तम दर्जा या चतु:सूत्रीचा अवलंब केलाच पाहिजे.. पुणे-मुंबईच्या दोन तरुण व्यावसायिक कोल्हापुरी चप्पल कशी बनवावी आणि ती जगभर टेचात कशी विकावी याच्या टिप्स जिथे कोल्हापुरी चपलेचे मूळ स्थान असलेल्या खुद्द कोल्हापुरातील कारागिरांना देत होते. हर्षवर्धन पटवर्धन आणि हितेश केंजळे अशी या तरुणांची नावे. व्यवसायातील या चार युक्तीच्या गोष्टी प्रौढत्वाकडे झुकलेले कारागीर कानात प्राण आणून ऐकत होते. निर्मात्यांनाच निर्मितीचे मर्म उलगडून दाखवणारे हे निमित्त होते करवीरनगरीत शुक्रवारी शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या चप्पल बनवणाऱ्या कारागिरांच्या कार्यशाळेचे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने जिल्ह्णाातील चप्पल बनविणाऱ्या कारागिरांची एकदिवसीय कार्यशाळा येथे आयोजित केली होती. सहभागी झाले होते जिल्ह्णाातील कारागीर. विविध कारणांनी चप्पल व्यवसाय अडचणीत आलेला. ग्राहक मिळवताना किमतीशी तडजोड करावी लागते. दुसरे काही फारसे जमत नाही म्हणून मग हाच पिढीजात उद्योग करायचा, या मानसिकतेत सारे कारागीर. त्यातील बरेचसे प्रौढ, काही वृद्ध. तरुण मात्र शोधून काढण्याजोगा. परिस्थितीने थकले, भागले, गांजलेले हे कारागीर आज मात्र नव्या आशेने हर्षवर्धन-हितेश या युवकांचे म्हणणे कानात साठवत राहिले. हर्षवर्धन पटवर्धन हा पुण्याचा. ‘चॅपर्स’ नावाचा कोल्हापुरी चपलांचा त्याचा ब्रँड जगभर विकला जातोय. वर्षांकाठी १ कोटीची उलाढाल होते. तर मुंबईचा हितेश केंजळे ‘देसी हँगओव्हर’ हा त्याचा चप्पलचा ब्रँड सध्या देशी ब्रँडसुद्धा कसे खणखणीत नाणे आहे हे जगाला दाखवून देत आहे. विदेशात शिकलेले हे दोघेही कोल्हापुरी चपलांच्या प्रेमात पडलेले. कोल्हापूरचे हे चलनी नाणे जगाच्या बाजारात ग्राहक ठरवेल त्या नव्हे तर आपण ठरवलेल्या किमतीने विकत आहेत. कोल्हापुरात कोल्हापुरी चप्पल हजार-पाचशेला विकताना दमछाक होते, पण हर्षवर्धन तीन हजाराच्या खाली त्याने बनवलेली कोल्हापुरी चप्पल विकतच नाही. या दोघा नवउद्यमींची ओळख करू दिली तेव्हाच ‘कसे जमले हे सारे या दोघांना’ हा प्रश्न कारागिरांच्या चेहऱ्यावर तरळत होता. हर्षवर्धन आणि हितेशनेही मग आपल्याकडील माहिती, नवनिर्मिती, तंत्रज्ञान याचा खजिना दिलखुलासपणे रिता केला. कोल्हापुरी चप्पल समोर असणारी आव्हाने, स्पर्धा, अडचणी हे सगळे काही समजून घेऊनसुद्धा जगाची बाजारपेठ कशी जिंकता येईल याच्या ‘सांगेन गोष्टी चार युक्तीच्या’ या पद्धतीने मांडत दोघांनी नकारात्मक बाबीवर मात कशी करता येते याचा वस्तुपाठ मांडला. माहिती, युक्ती आणि मदतीचा हात साध्या-सोप्या भाषेत त्यांनी बदललेल्या बाजार पद्धतीत केवळ टिकाव धरण्याचेच नव्हे तर उत्पादित मालाची स्वतंत्र ओळख कशी करायची याची काही गुपितेही सांगितली. चपलेतील उणिवा दूर कराव्यात, नावीन्य आणि वैविध्य कसे आणावे, वापरकर्त्यांला बोचणार-टोचणारी नाही अशी आरामदायी, मुलायम तरीही ती टिकाऊ कशी बनवावी, त्याला फॅशन-रंगसंगतीची जोड कशी द्यावी, त्यासाठी तंत्रज्ञानाची जोड कशी द्यावी अशा अनेक मुद्दय़ांबाबत त्यांनी माहिती सांगितली. कारागिरांच्या शंकांचे निरसन केले. इतकेच नाही तर कोल्हापुरात येऊन इथल्या कारागिरांना नव्या रंगाची-ढंगाची कोल्हापुरी चप्पल कशी बनवावी यासाठी मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली, तीही कोणतेही शुल्क न आकारता, केवळ कोल्हापुरी चप्पल जगभर पोहोचवण्याच्या प्रेमापोटी.