कोल्हापूर हद्दीवाढीच्या विरोधातील ग्रामीण भागातील जनतेचा रोष गुरुवारी पुन्हा प्रकटला. हद्दवाढीला विरोध करीत सात गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या भागातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या विरोधात १७ गावांतील ग्रामस्थ सातत्याने रस्त्यावर येत आहेत. या अंतर्गत गुरुवारी करवीर विधानसभा मतदारसंघाशी निगडित सात गावांत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला पूर्णत: प्रतिसाद मिळाला. बािलगा, िशगणापूर, नागदेववाडी, आंबेवाडी, शिये, वडणगे, वाडीपीर या गावातील व्यवहार पूर्णत: ठप्प झाले होते. सकाळपासूनच दुकाने बंद राहिल्याने गावात शुकशुकाट जाणवत होता. नागरिक रस्त्यावर येऊन हद्दवाढीच्या विरोधात घोषणा देत होते. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली आजचे आंदोलन झाले. आमदार नरके, जिल्हा परिषद सदस्य एस आर. पाटील, बाजीराव पाटील, तालुका पंचायत सदस्य सरदार मिसाळ आदींनी गावोगावी जाऊन ग्रामस्थांच्या आंदोलनाला बळ दिले. २९ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार असून, आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा नरके यांनी दिला.