कोल्हापूर : राजकीय वादातून शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षांचा गोळीबार करून खून केल्याप्रकरणी आरोपी सुरेश भाऊसाहेब पाटील (वय ४३, रा. आरळे, ता. करवीर) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. विठलानी यांनी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा गुरुवारी सुनावली. आरळे गावच्या सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यामुळे भरत भाऊसाहेब पाटील व त्यांच्या गटातील कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे गावच्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हिंदुराव विष्णू पाटील व भारत पाटील या दोन राजकीय गटामध्ये वारंवार वाद होत होते.

२१ फेब्रुवारी २००८ रोजी हिंदुराव पाटील यांच्या संस्थेच्या शाळेच्या पटांगणात भरत पाटील व त्यांचे गटातील लोक काठय़ा, कुऱ्हाडी व तलवार घेऊन आले. त्यांनी हिंदुराव पाटील गटातील लोक व संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग देसाई यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. सुरेश पाटील यांनी त्यांच्याजवळील बंदुकीने पांडुरंग देसाई यांच्यावर गोळी झाडली. त्यात देसाई हे जागीच ठार झाले.

पोलिसांनी भरत पाटील यांच्यासह पांडुरंग दिनकर पाटील, बाजीराव निवृत्ती पाटील, तानाजी मारुती पाटील, नामदेव निवृत्ती पाटील (सर्व रा. आरळे) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्य़ाचा तपास करवीरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांनी केला होता. तर सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील अ‍ॅड. एन.बी.आयरेकर यांचा युक्तिवाद ग्रा धरून शिक्षा ठोठावली. इतर आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले.