शिवसेनेच्या ताब्यातील महापालिकांमध्ये इमारत कोसळून, आग लागून मनुष्यहानी होते, तेव्हा शिवसेना गप्प बसते. इतर ठिकाणी मात्र हत्येचा जाब विचारण्यासाठी पुढे येते, अशा शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर हत्याकांडाची तुलना अपघातांशी केली.

कोल्हापूर येथे आलेल्या विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेवर टीका केली. या हत्येवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेवर हल्ला चढवताना त्यांनी मुंबईत पडलेल्या इमारतींचे, आगी लागण्याचे तपशील दिले. ते म्हणाले , की शिवसेनेच्या ताब्यातील महापालिकांमध्ये इमारत कोसळून, आग लागून मनुष्यहानी होते. त्या वेळी शिवसेना गप्प बसते. इतर ठिकाणी मात्र जाब विचारण्यासाठी पुढे येते.

नगरमधील हत्याकांड आणि मुंबईत घडलेल्या अपघातांची त्यांनी केलेली एकत्रित तुलना ऐकून उपस्थित सारेच जण अवाक झाले. शेवटी आपली निसटलेली वाट सावरत त्यांनी या हत्याकांडाचा निषेध केला. तसेच, यामध्ये काँग्रेसचे देखील कोणी गुंतले असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यास आमची कसलीही आडकाठी नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.