सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल उभारण्यात येणार आहे. तसेच चालू शैक्षणिक वर्षापासूनच अध्ययनाचे काम सुद्धा सुरु होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी सायंकाळी येथे दिली.

शिवाजी विद्यापीठात सामंत यांनी विविध विभागप्रमुखांची एकत्रित बैठक घेऊन विद्यापीठाच्या अडचणी जाणून घेतल्या. सीमाभागातील विद्यार्थ्यांवर होत असलेला कन्नड भाषेचा मारा थोपवण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात बैठक झाली होती. यासाठी प्रभारी कुलगुरु करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. याबाबत खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर हे उपस्थित होते.

बेळगाव आणि चंदगड या मार्गावर शैक्षणिक संकुल सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. चंदगड तालुक्यातील तुडये, म्हाळुंगे आणि शिनोळी या ठिकाणच्या जागेची पाहणी केली असून जागा ताब्यात येण्यास वेळ लागणार आहे. तथापि या परिसरातील भाडेतत्वावर जागा अथवा इमारती घेवून येत्या शैक्षणिक वर्षापासून अध्ययनाचे काम सुरु करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे सामंत यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

परीक्षा नाहीच!

युजीसी व परीक्षा या प्रश्नावर बोलतांना सामंत यांनी करोनाच्या काळात परिक्षा घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले. ज्यांना ऐच्छिक परिक्षा द्यायची आहे, ते देवू शकतात असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.