कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सत्ताधारी- विरोधक यांच्यातील प्रचंड गदारोळ, एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोप यामुळे चांगलीच गाजली. या गोंधळातच सर्व विषयांना सत्ताधाऱ्यांकडून मंजूर तर विरोधकांकडून नामंजूर असे नारे सुरू झाले. यातच राष्ट्रगीत म्हणून सभा आटोपती घेण्यात आली. प्रारंभी प्रास्ताविकात अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी साखर उद्योग अडचणीत असतानाही कुंभीने चांगला दर दिला असून जादा १०० रुपयेप्रमाणे दोन लाख टनाचे पैसे अदा केले असून चार लाख टनाचे पैसे लवकरच अदा करणार असल्याचे सांगितले. विरोधकांचे टीकास्त्र यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी कुंभी कारखाना सर्वाधिक म्हणजे प्रतिटन ५०० रुपये व्याज भरत असून कारखान्यावर ४९३ कोटींचे कर्ज आहे असे सांगून व्याजाचा बोजा कारखान्याला सोसणार का, जिंदगीत वाढ दाखविल्याबाबत तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पाचे हप्ते कशातून फेडता असे प्रश्न उपस्थित केले. नरके म्हणाले, कारखान्याचे व्याजदर निश्चित वाढले आहेत. ४९३ कोटींचे कर्ज दिसत असले तरी ६३६ कोटींचे आमचे भांडवल आहे. पुन्हा यातून ५२ कोटी साखरेचे वजा करता ६४ कोटींने नेटवर्थ राहते. कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिंदगीत वाढ करावीच लागते, असा खुलासा केला. अॅड. प्रकाश देसाई, बुद्धिराज पाटील, प्रा.टी.एल.पाटील, संभाजी पाटील, नामदेव गावडे, संजय पाटील यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. नरके बंधूत यादवी संदीप नरके यांनी कारखान्याच्या कारभारावर बोलणार असे म्हणताच चंद्रदीप नरके यांनी विषयपत्रिकेवरच बोलायचे असे सांगितले, याचवेळी संदीप नरकेंना ‘खाली बस’ असे म्हणत अजित नरकेही आक्रमक बनले. त्यानंतर दोन्ही बाजूच्या सभासदांनी जोरदार गदारोळ करण्यास सुरुवात केली. यावेळी नरके बंधूत शाब्दिक चकमकीही झाल्या. ‘कुंभी’वर प्रशासक नेमण्याची मागणी विरोधकांनी आक्रमक होत सभागृहातच समांतर सभा घेतली. खाडे यांनी सत्तेच्या जोरावर सभासदांना विश्वासात न घेता सभासद साखर दर वाढविणाऱ्या व पळ काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध करत असल्याचे सांगितले. सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी नरके यांच्या कारभारावर टीका करत कुंभी कारखान्यात मोठा भ्रष्टाचार वाढल्याने कारखाना डबघाईला आला आहे. त्यासाठी कारखान्यावर प्रशासक नेमावा अशी मागणी केली.