कोल्हापूर : केरळमधील शाळांच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील अनफ बुद्रुक शाळेत अनोखा 'वॉटर बेल' उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी दर तासाने ही बेल वाजवली जाते. जिल्ह्यात असा उपक्रम राबविणारी ही जिल्हा परिषदेची पहिलीच शाळा आहे. बदलत्या वातावरणामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. मुलांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. मुलांना बद्धकोष्ठता, मूळव्याध, उष्णतेचा त्रास, अशक्तपणा जाणवतो. त्यांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहावे व आरोग्य चांगले राहावे यासाठी शिक्षक सागर मोरे यांच्या पुढाकाराने विद्या मंदिर अनफ बुद्रुक या शाळेने ' वॉटर बेल ' हा अभिनव उपक्रम राबविला आहे. दिवसभरात दर एक तासाने वॉटर बेलकरिता घंटा वाजविली जाते. त्यानंतर मुले आपापल्या बाटलीतील पाणी पितात. शाळेत पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले जाते. अधिक पाणी पिणे शरीरासाठी योग्य मानले जाते. सागर मोरे 'पाण्याचे महत्त्व ' या विषयावर म्हणाले 'पाणी हेच आपले जीवन आहे. शरीराचा समतोलपणा राखायचा असेल तर शरीरात विशेष प्रमाणात पाणी असले पाहिजे.' शिक्षिका सुजाता राणे यांनी सहकार्य केले. दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत चालले असताना मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे बऱ्याच वेळा मुले आजारी पडतात. विद्यार्थ्यांमध्ये शिकताना उत्साह दिसत नाही, त्यासाठी शरीरात आरोग्याच्या दृष्टीने पाण्याचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी वॉटर बेल हा उपक्रम शाळेने राबविला आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांंसह शिक्षकांनाही होतो आहे.