कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक दुरंगी होवो की बहुरंगी; भाजपचाच उमेदवार निवडून येणार हे नक्की. पाच राज्यातील निवडणुकीत मतदारांनी काँग्रेससह विरोधकांना नाकारून भाजपला स्वीकारले आहे. त्याचीच पुनरावृत्ती या पोटनिवडणुकीत होईल, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले,की राज्यात, देशात यापुढे होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत भाजपचा विजय होणार आहे. देशातील कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम नेतृत्व असल्याचा प्रत्यय मतदारांनी पाच राज्यांच्या निवडणुकीत दाखवून दिला आहे. पोटनिवडणुकीसाठी पक्षाने घेतलेल्या मुलाखतीतून सत्यजित कदम व महेश जाधव ही दोन नावे केंद्रीय समितीकडे पाठवली आहेत. सत्यजित कदम यांच्या नावाला प्राधान्य राहील, असे म्हणत त्यांनी कदम यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे संकेत दिले. जाधवांनी भाजपकडून लढावे कोल्हापूरची पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा काही नेत्यांनी सुरू केली असली तरी त्यात तथ्य नाही, असा उल्लेख करून आमदार पाटील म्हणाले, राज्यात अशी परंपरा आहे की कोणा आमदाराचे निधन झाले की त्यांच्या घराण्याला सर्वानी मदत करावी. जयश्री जाधव तसेच त्यांचे दीर संभाजी जाधव हे भाजपचे नगरसेवक होते. त्यामुळे जयश्री जाधव यांनी भाजपकडून ही निवडणूक लढवावी आणि दोन्ही काँग्रेसने त्यांना पािठबा द्यावा; तरच निवडणूक बिनविरोध होऊ शकते. बिनविरोधाची चर्चा; पण.. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. जयश्री जाधव यांना भाजपने पािठबा द्यावा असा प्रस्ताव घेऊन पालकमंत्री सतेज पाटील मला भेटले होते. भाजपने निवडणूक कमळ चिन्हावर निश्चितपणे लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे आपण त्यांना सांगितले, असे चंद्रकांतदादांनी या वेळी स्पष्ट केले.