करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात रोज नवा वाद निर्माण होत बाहे. आता वार्तांकनासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना कॅमेरा बंदी लागू करण्यात आली आहे. महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेबाबत काही निर्णय घेण्यात आले आहे. त्याचा फटका माध्यमांना बसत आहे. गुरुवारी महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वारावरच माध्यमाकर्मींना रोखण्यात आले. कॅमेरा घेवून आता जाता येणार नाही असे सुरक्षा रक्षकांनी सांगितले. त्यावर देवस्थान सचिव शिवराज नायकवडी यांनी मंदिर सुरक्षेच्या दृष्टीने काही निर्णय घेतले आहेत. कोणालाही कॅमेरा घेवून मंदिरात जाता येणार नाही. मंदिर प्रशासक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तसा आदेश काढल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने म्हटले आहे. कोल्हापूरचं अपवाद कसे? गेल्या काही दिवसांपासून श्री महालक्ष्मी मूर्तीचा मुद्दा वादग्रस्त होत असल्याचे समोर आले आहे. यावरुन कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे. मात्र या निर्णयाचा फटका माध्यमांना बसला आहे. दुसरीकडे, मंदिरात जाणाऱ्या भाविकांना मोबाईल वापरण्यास मुभा आहे. त्याद्वारे छायाचित्रे , चित्रीकरण केले तर त्यास कोणी अटकाव करणार नाही. राज्यात कोणत्याच देवस्थानात माध्यमांना कॅमेरा सोबत नेण्यास, चित्रीकरण, छायाचित्रे काढण्याची सोय असताना कोल्हापूर मात्र त्यास अपवाद ठरल्याने त्याची चर्चा आहे.