कोल्हापूर : बदलायचे होते गावाचे नाव पण बदलले गेले संपूर्ण तालुक्याचेच नाव. असा प्रकार सोमवारी चंदगडकरांनी अनुभवला. याचा फटका नागरिकांसह प्रशासनाला बसला. नंतर प्रशासनाने हालचाली केल्याने चूक सुधारण्यात आली. त्याचे झाले असे, चंदगड तालुक्यात (जिल्हा कोल्हापूर) 'डुक्करवाडी' गावचे नाव आहे. हे नाव योग्य नसल्याने त्यात बदल करून ते 'रामपूर' करावे अशी मागणी गावकऱ्यांनीराज्य शासनाकडे केली होती. त्यास शासनाने अलीकडे मंजुरी दिली होती. नावात बदल करण्याचे काम राज्यशासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडे तसेच एनआयसी ( राष्ट्रीय माहिती केंद्र) यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आला. मात्र या दोन्ही यंत्रणांकडून या गावाचे नाव रामपूर करण्याऐवजी थेट चंदगड तालुक्याचेच नाव बदलून टाकण्याचा पराक्रम केला. हेही वाचा >>>कोल्हापूर: गोकुळचे चाचणी लेखा परीक्षण; संचालक मंडळाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने धक्का फटका आणि दुरुस्ती तालुक्यातील एका नागरिकाने उत्पन्न दाखला काढण्यासाठी गेल्यानंतर ही बाब समोर आली. उत्पन्न दाखल्याची ऑनलाइन प्रत काढली असता त्यावर तहसीलदार कार्यालय चंदगड ऐवजी तहसीलदार कार्यालय रामपूर असे लिहिण्यात आले होते. संबंधित व्यक्तीने अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर या तालुक्यातील सर्व ऑनलाईन कामकाज थांबवण्यात आले आहे. परिणामी अनेकांचे दाखले व ऑनलाईन कामकाज खोळंबले. यातून सरकारचा भोंगळ कारभार समोर आल्याने नाहक त्रास झालेल्या नागरिकांना तीव्र भवन व्यक्त केल्या. तर हा दोष दुरुस्त करण्यात आला असल्याचे चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी 'लोकसत्ता'ला सांगितले.