सामाजिक अंतराचा फज्जा

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचे चार बळी गेले. सायंकाळपर्यंत ११७ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक रुग्ण असलेल्या हातकणंगले तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला. इचलकरंजीतील ५५ वर्षांची व एक ३६ वर्षांंची स्त्री, तर तळसंदे येथील ४८ वर्षांंचा पुरुष व हुपरीतील ५२ वर्षांचा पुरुष या बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सायंकाळपर्यंतच्या अहवालानुसार ११७ नवे करोना सकारात्मक रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील आत्तापर्यंतची करोना बाधित रुग्णांची संख्या दोन हजाराकडे जाताना दिसत आहे. मृत व्यक्तींचा आकडा एकूण पन्नास झाला आहे.

करोनाचा बाजार तेजीत जिल्ह्यात उद्यापासून (सोमवार) आठवडाभर कडक टाळेबंदी लागू केली आहे. करोनाची साखळी तोडण्याचा हा प्रयत्न असताना त्याला जनतेकडूनच पायदळी तुडवले गेले असल्याचे चित्र आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळाले. मंगळवारपासून श्रावण महिना सुरू  होणार असल्याने मांसाहारी प्रेमी कोल्हापूरकरांनी आज सकाळपासूनच मटण, चिकन, मासे दुकानासमोर रांगा लावल्या होत्या. तर, दुपारनंतर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी केली होती. भाजी मंडईमध्ये तर पाय ठेवायलाही जागा नाही असे चित्र होते. सर्वाधिक रुग्ण असलेल्या इचलकरंजीत तर दिवाळीचा बाजार भरावा अशी गर्दी झाली होती. त्याची छायाचित्रे पाहून समाज माध्यमात ‘आता फक्त आकाश कंदील, फटाके उरले आहेत, बाकी दिवाळीचा बाजार भरात आहे,’ अशा शब्दांत रेवडी उडवली जात होती. कोल्हापूर शहर असो की खेडे गाव, सर्वत्रच सामाजिक अंतराचा नियम आपणच पायदळी तुडवत आहोत याचे कोणालाच भान उरले नव्हते.

टाळेबंदी सवलतीत वाढ

शनिवारी फक्त दूध, औषध, वृत्तपत्र यांनाच मर्यादित वेळेत विक्रीस परवानगी होती. तर, जिल्हा दंडाधिकारी दौलत देसाई यांनी पूर्वसंध्येला जारी सुधारित आदेशानुसार बँकांची मुख्य कार्यालये; उद्योगांमध्ये ५० टक्के कर्मचारी; दूध संकलन व वाहतुकीस वेळ मर्यादा नाही असा विस्तार केला आहे.