कोल्हापूर शहरात आजपासून सुरू झालेल्या जनता संचारबंदीला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी अनेक दुकाने सुरू होती तर काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून याला प्रतिसाद दिला.  शहरामध्ये करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शहरांमध्ये शुक्रवारपासून जनता संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने एक आठवड्यासाठी जनता संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे, तर महापालिकेत झालेल्या बैठकीत दहा दिवसांसाठी ऐच्छिक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

संचारबंदी लागू करण्यावरून चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाला होता.तयार कपड्याच्या विक्रेत्यांनी या बंदला विरोध दर्शवला आहे. यामुळे शहरातील बहुतांशी कपड्याचे दुकान आज सुरू होते. याचबरोबर राजारामपुरी, करवीर निवासिनी महालक्ष्मीचे मंदिर असलेला महाद्वार रोड, शाहूपुरी या महत्त्वाच्या ठिकाणचे दुकाने बहुतांशी सुरू होती. तर शिवाजी पेठ भागात आवाहन केल्याप्रमाणे या भागातील सर्व व्यवहार बंद होते. काही व्यापारी दुकान सुरू करण्याबाबत विचारात पडले होते.

शहरातील औषध, दुध ,कृषी ,पेट्रोल पंप ,बँक आदी ठिकाणचे व्यवहार सुरू होते. आजच्या बंदमध्ये सहभागी करून घेण्याबाबत छोटा विक्रेत्यांना विचारात घेतलेले नव्हते. छोट्या विक्रेत्यांची परिस्थिती गेली चार महिने खूपच बिघडलेली आहे. त्यामुळे छोटे व्यापारी आजच्या बंदमध्ये सहभागी झाले नाहीत, असे महाद्वार रोड वरील छोटे व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी महेश उरसाल यांनी लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. कोल्हापूर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी ही आजच्या बंदला विरोध दर्शवला आहे त्यामुळे आजचा बंद फारसा यशस्वी ठरल्याचे दिसत नाही.