कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक लढवत असल्याचे आवाडे यांनी जाहीर केले. यामुळे या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पंचरंगी होणार आहे. आमदार आवाडे यांच्यासोबत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे व शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक वेगवेगळी वळणे घेताना दिसत आहे. याआधी महायुतीकडून शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने हे रिंगणात आहेत. तर त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आव्हान दिले आहे. तीन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची उमेदवारी शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बी. सी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ही चौरंगी लढत लोकसभा मतदारसंघात चर्चेत असताना आज त्याला आणखी वेगळे वळण मिळाले.

हेही वाचा – निवडणूक रोख्यातून भाजपने १० हजार कोटी रुपये जमवले; जयंत पाटील यांचा आरोप

आज पत्रकार परिषदेत इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली. ते त्यांच्या ताराराणी आघाडीच्या वतीने ही निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आहेत. त्यांच्या या उमेदवारीने लोकसभा निवडणुकीची चुरस आणखी वाढली आहे. दरम्यान प्रकाश आवाडे यांना जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक पन्हाळा शाहूवाडीचे आमदार विनय कोरे तसेच शिरोळचे शिंदे सेनेचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे प्रकाश आवाडे, विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर या तीन अपक्षांचे या मतदारसंघात राजकीय ऐक्य झाले असून हे त्रिकूट कोणता राजकीय प्रभाव दाखवणार याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्ह्याच्या राजकारणाला हे वेगळे वळण असून त्याचा लोकसभा निवडणुकीवर लक्षणीय परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आवडे आणि लोकसभा जुना संबंध

दरम्यान आवाडे घराण्याने यापूर्वी लोकसभेच्या तीन निवडणुका लढवलेल्या आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांचे वडील माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी ११९६ साली लोकसभेची पहिली निवडणूक निवेदिता माने यांच्या विरोधात लढवून जिंकली होती. दुसरी निवडणूक ही या दोघांमध्ये होऊन आवाडे विजयी झाले होते. तर तिसऱ्या निवडणुकीमध्ये निवेदिता माने या विजयी झालेल्या होत्या. त्यानंतर राजू शेट्टी यांच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती. मात्र त्यांना थांबावे लागले होते. आता यावेळी निवडणूक लढवण्याची राहुल आवाडे यांनी तयारी केली होती. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असलेले राहुल आवाडे यांनी मतदारसंघात संपर्कही वाढवलेला होता. गेल्या आठवड्यात त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणूक लढवण्याबाबत चाचणी केली होती. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी झाल्याचेही सांगितले होते. तथापि प्रत्यक्षात आज आमदार प्रकाश आवाडे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून जिल्ह्याच्या राजकारणाला हे नवे वळण लागले आहे.

हेही वाचा – “महाराज अजूनही वेळ गेलेली नाही…”, हसन मुश्रीफ यांचा छत्रपती शाहूंना इशारा

प्रकाश आवाडेच का?

राहुल आवाडे यांच्यापेक्षा मी निवडणूक लढवली तर ६०-७० हजार अधिक मते मिळू शकतात. यामुळे मी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे असे प्रकाश आवाडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आवाडे यांची उमेदवारी ही महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना शह देण्यासाठी असल्याची चर्चा आहे. माने यांच्या उमेदवारांच्या विरोधात त्यांनी आधीच नाराजीचा सूर लावला होता. तर आता आवाडे प्रत्यक्ष रिंगणात उतरले आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla prakash awade in hatkanangle lok sabha arena ssb
Show comments