भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी नव्याने अर्ज मागवले. पण महत्वाची बाब म्हणजे पीटीआयच्या वृत्तानुसार या पदासाठी अर्ज करणाऱ्यांचे वय हे ६० पेक्षा कमी असावे आणि त्या उमेदवाराला किमान २ वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव अशी अट ठेवण्यात आली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओ, स्ट्रेन्थ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक आणि प्रशासकीय व्यवस्थापक या जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ३० जुलै संध्याकाळी ५ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची कालमर्यादा देण्यात आली आहे. या प्रशिक्षकांची निवड करण्यासाठी बीसीसीआयने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या BCCI च्या प्रशासकीय समितीने तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती नेमली आहे. ही समिती मुख्य प्रशिक्षकाची निवड करणार आहे. या समितीचे अध्यक्षपद माजी कर्णधार कपिल देव यांच्याकडे देण्यात आले असून त्यांच्यासह अंशुमन गायकवाड व शांथा रंगास्वामी हे देखील या समितीचे सदस्य आहेत. नव्याने प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रियेबाबत सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगल्या आहेत. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षक आर श्रीधर यांचे पद कायम राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. याआधी BCCI ने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांची सल्लागार समिती नेमली होती, पण ही समिती बरखास्त करण्यात आली.

दरम्यान, मुख्य प्रशिक्षकपदी अर्ज करणाऱ्याने किमान २ वर्षांसाठी एखाद्या कसोटी दर्जा प्राप्त असलेल्या संघाचे प्रशिक्षक पद भूषवले असायला हवे किंवा ICC चे संलग्न सदस्य संघ / या संघ / IPL संघाचे ३ वर्ष प्रशिक्षकपद सांभाळण्याचा अनुभव हवा. तसेच अर्जदाराला ३० कसोटी सामने किंवा ५० एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव हवा, असे BCCI च्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सध्याच्या प्रशिक्षक वर्गाला ४५ दिवसांचा वाढीव कालावधी देण्यात आला आहे. यापैकी सर्व जण या पदासाठी अर्ज करू शकतात. पण ते असले तरी भारतीय संघाला नवे फिटनेस ट्रेनर आणि फिजिओ मिळणार आहेत. कारण सध्याच्या या २ प्रशिक्षकांनी कार्यकाळ संपल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.