१९ वर्षांखालील (Under 19 ) आशिया चषकावर भारतीय संघाने आपले नाव कोरले आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये अखेरचा सामना कोलंबो येथे रंगला होता. भारताचा डाव बांगलादेशाने १०६ डावात गुंडाळल्यानंतर हे लक्ष्य बांगलादेश सहज पार करेल आणि आशिया चषकावर आपलं नाव कोरेल अशीच शक्यता वाटत होती. मात्र मुंबईकर अथर्व अंकोलेकरने २८ धावांच्या मोबदल्यात बांगलादेशचे पाच बळी टीपले. त्यामुळे भारताच्या विजयाची वाट सुकर झाली. भारताने आजचा सामना जिंकून सातव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरेश पारकर चार धावा करुन बाद झाला, अर्जुन आझाद शून्यावर, तर तिलक वर्मा २ धावांवर बाद होऊन अवघ्या आठ धावांमध्ये तंबूत परतले. कर्णधार ध्रुव जुरेलने ३३ धावा करुन संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शाश्वत रावतने १९ धावा करुन त्याला साथ दिली. मात्र टीम इंडियाला धावफलकावर शंभरीही गाठता आली नव्हती. अशात करण लालने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करुन ३७ धावा केल्या त्यामुळे संघाला धावफलकावर १०६ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताचा पूर्ण संघ ३२.४ षटकामध्ये १०६ धावा करुन बाद झाला.

आता १०६ धावांचं लक्ष्य बांगलादेश सहज पार करेल आणि आशिया चषकावर आपलं नाव कोरेल असं वाटलं होतं. मात्र अथर्वच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशची फलंदाजी ढेपाळली. २८ धावांच्या मोबदल्यात अथर्वने बांगलादेशचे पाच बळी टीपले आणि त्यामुळे भारताच्या विजयाची वाट सुकर झाली.