IPL 2019 MI vs CSK : स्पर्धेतील Playoffs च्या पहिल्या सामन्यात (Qualifier 1) चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण धोनीचा हा निर्णय चेन्नईसाठी सुरुवातीच्या षटकांत फारसा फायदेशीर ठरला नाही. मुंबईचे वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू यांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे चेन्नईने २० षटकात ४ बाद १३१ धावांपर्यत मजल मारली आणि मुंबईला १३२ धावांचे आव्हान दिले.

या सामन्यात धोनीला एका नो बॉलने वाचवलं. १९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बुमराहने टाकलेला फुल टॉस चेंडू धोनीने टोलवला. तो चेंडू ३० यार्ड वर्तुळाच्या वरून सीमारेषेवर जाणार असे वाटत असतानाच ईशान किशन याने सुंदर झेल टिपला. या फटका खेळताना धोनीच्या हातून बॅट सुटली. ती बॅट घेऊन धोनी तंबूकडे परतणार तोच रिप्लेमध्ये बुमराहने तो चेंडू नो बॉल टाकल्याचे स्पष्ट झाले आणि धोनीला बाद होण्यापासून नो बॉलने वाचवलं. त्यानंतर धोनीने चेन्नईच्या धावसंख्येत ६ धावांची भर घातली.

दरम्यान, सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. चेन्नईच्या डावाची सुरुवात खराब झाली. एक जीवनदान मिळाल्यानंतर त्या संधीचा फायदा डु प्लेसिसला घेता आला नाही. तो एका चौकारासह ६ धावा करून माघारी परतला. चांगल्या लयीत असलेला सुरेश रैना स्वस्तात बाद झाला. षटकात आधीच फ्री हिटवर चौकार मिळाल्यानंतर आणखी एक मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरला नाही आणि तो जयंत यादवच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने केवळ ५ धावा केल्या. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर शेन वॉटसनने संयमी सुरुवात केली, पण नंतर धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात तो देखील मोठा फटका खेळून बाद झाला. जयंत यादवने उलट धावत जाऊन त्याचा अप्रतिम झेल टिपला. केदार जाधव दुखापतग्रस्त असल्याने संधी मिळालेला मुरली विजय चांगली सुरुवात केल्यानंतर यष्टिचीत झाला. मुरली विजयला काही कळण्याआधीच यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने यष्ट्या उडवून त्याला माघारी धाडले. मुरली विजयने २६ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २६ धावा केल्या. अखेर अंबाती रायडू आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यान दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली आणि चेन्नईला १३१ धावांपर्यंत मजल मारून दिली. रायडूने नाबाद ४२ तर महेंद्रसिंग धोनीने नाबाद ३७ धावा केल्या.

या सामन्यासाठी दोनही संघांमध्ये १-१ बदल करण्यात आला. मुंबईने डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनेघन याला वगळून त्याच्या जागी फिरकीपटू जयंत यादवला संधी दिली आहे. तर चेन्नईच्या केदार जाधवला दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली असून त्या जागी मुरली विजयला संघात स्थान मिळाले आहे. या स्पर्धेत आतपर्यंत हे दोन संघ २ वेळा आमनेसामने आले. त्यात दोनही वेळा मुंबईने चेन्नईला पराभूत केले आहे.