भारताचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याने त्याच्या कारकिर्दीत अनेक चांगल्या खेळी केल्या, पण त्याची नेतृत्वशैली ही अधिक चर्चेचा विषय ठरला. १९९९ च्या विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू मॅच फिक्सिंगच्या वादात अडकले. त्यानंतर नव्या भारतीय संघाची बांधणी करण्याची जबाबदारी सौरव गांगुलीवर होती. त्याने २००० सालानंतर नव्या दमाच्या खेळाडूंना सोबत घेऊन नवी टीम इंडिया उभी केली. याच टीम इंडियाने २००२ साली नॅटवेस्ट मालिकेत अंतिम सामन्यात विस्मयकारक असा विजय मिळवला. त्या विजयाला आज १८ वर्षे पूर्ण झाली. १३ जुलै २००२ साली भारताचे पाच महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर युवराज-कैफ जोडीने संघाला सामना जिंकवून दिला होता आणि त्यानंतर गांगुलीने टी-शर्ट फिरवून सेलिब्रेशन केलं होतं. भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस खास आहे. कारण इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर भारताने पराभूत केले होते. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताने केवळ २ गडी आणि ३ चेंडू राखून रोमांचक विजय मिळवला होता. युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ हे भारताच्या विजयाचे खरे शिल्पकार होते. सलामीवीर मार्कस ट्रेस्कॉथीक (१०९) आणि कर्णधार नासिर हुसेन (११५) यांच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ३२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचे पाच महत्त्वाचे खेळाडू स्वस्तात तंबूत परतले होते. ३ चेंडू शिल्लक असताना ८ विकेट गमावून ३२६ धावा केल्या आणि सामन्यासह विजेतेपद जिंकले. केवळ कर्णधार गांगुलीने ६० धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला होता. पण पाच गडी बाद झाल्यावरही मोहम्मद कैफ (नाबाद ८७) आणि युवराज सिंग (६९) या दोन नव्या दमाच्या फलंदाजांनी संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. कैफच्या कारकीर्दीतील हा सर्वात अविस्मरणीय डाव ठरला. त्यामुळे त्याने २०१८मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यासाठीही १३ जुलैचीच तारीख निवडली. निवृत्तीची घोषणा करताना त्याने या खेळीचा उल्लेख केला. #OnThisDay in 2002, India secured a memorable victory over England in the NatWest series final at Lord's. A brilliant century stand under pressure between Mohammad Kaif and Yuvraj Singh guided their side to a sensational two-wicket win with just three balls to spare pic.twitter.com/mNNS4jgAWY — ICC (@ICC) July 13, 2020 कैफ-युवराजच्या खेळीसह या विजयानंतर गांगुलीने टी-शर्ट काढून हवेत फिरवत विजय साजरा केला, तो क्षणही कायम स्मरणात राहिला. गांगुलीने आपला टी-शर्ट काढून अँड्र्यू फ्लिंटॉफला प्रत्युत्तर दिले होते. कारण त्याच वर्षी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध वन डे सामना जिंकल्यावर फ्लिंटॉफने आपला टी-शर्ट हवेत भिरकावला होता.