आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी पुण्याच्या ऋतुराज गायकवाडची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. यामुळे त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. लहान पणापासून क्रिकेटची आवड असलेल्या ऋतुराजला ही संधी मिळाल्याने कुटुंबीयांच्या आनंदाला पारावारच उरलेला नाही. या निवडीमुळे ऋतुराजच्या आतापर्यंत जडणघडणीचा प्रवास त्यांच्या वडिलांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. "तीन-चार वर्षाचा असताना त्याला प्लाष्टिकची बॅट, स्टंप घेऊन द्यायचो. 'तेव्हाच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' या म्हणी प्रमाणे तो उत्तम क्रिकेटर होऊ शकतो, असं वाटलं होतं," असं म्हणत ऋतुराजचे वडील दशरथ गायकवाड यांनी त्याच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. हेही वाचा- लक्षवेधी कामगिरीसाठी ऋतुराज उत्सुक ऋतुराजचे वडील दशरथ हे (डिआरडीओ) सुपर क्लासवन अधिकारी होते. ते नुकतेच निवृत्त झाले आहेत. तर, आई सविता गायकवाड या महानगर पालिकेच्या शाळेत शिक्षिका आहेत. ऋतुराजच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत वडील म्हणाले की, "ऋतुराज लहान असताना त्याला बॉल, बॅट, स्टंप आणून द्यायचो. जेव्हा तो खेळायचा, त्यावेळी चांगल्या पद्धतीने खेळत असल्याच निदर्शनास आलं. बॅटवरील पकड, धावणं, चपळता हे पाहून तो उत्तम क्रिकेटर होईल असं वाटायचं." हेही वाचा- क्रिकेटचा सराव करत असताना ऋतुराजने पाच वर्षात एक दिवसही सुट्टी घेतली नाही – प्रशिक्षक पुढे बोलताना ते म्हणतात, "ऋतुराजच क्रिकेटबद्दलचं प्रेम पाहुन १२व्या वर्षी त्याला पिंपरी-चिंचवड शहरातील वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवून दिला. तिथे तो क्रिकेटचे धडे गिरवू लागला. त्याला केवळ पाठिंबा देण्याचं काम आम्ही केलं आहे," असं दशरथ गायकवाड सांगतात. "त्याच्या सरावात अडचण होईल असं काहीही आम्ही केलं नाही. गावाकडे जाणे, इतर कार्यक्रम आम्ही टाळले. जेणेकरून त्याच्या सरावात अडचण येणार नाही. त्यानंतर ऋतुराजने स्वतः ला सिद्ध करत मेहनत केली. आयुष्यात अनेक चढउतार आले. मात्र, त्याने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवून स्वतः ला सिद्ध केलं आहे," असं सांगताना त्यांची धाडी छाती अभिमानानं फुलून गेली.