छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा सीमा भागातील जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 22 सैनिक शहीद झाले, तर अनेक जखमी झाले. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

अहवालानुसार, कुख्यात नक्षलवादी हिडमाला पकडण्यासाठी सुरक्षा दलाच्या 2000 जवानांचे पथक जंगलात घुसले होते. यावेळी हल्ल्यात नक्षलवाद्यांनी सैनिकांवर हल्ला केला. या चकमकीत जवानांनी 15 नक्षल्यांना कंठस्नान घातले आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवांनाना विराट, सेहवाग, जडेजा, योगेश्वर दत्त यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 

विजापूरच्या जंगलात काय घडले?

सुकमा-विजापूर सीमाभागात बस्तरच्या दक्षिणेकडे जंगलात नक्षलवाद्यांचा मोठा अड्डा आहे. विजापूरपासून ते सुकमा जिल्ह्यापर्यंत शुक्रवारी रात्री नक्षलविरोधी कारवाई करण्यात हाती घेण्यात आली होती. शनिवारी (3 एप्रिल) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गस्ती पथक आणि पीएलजीएच्या नक्षलवाद्यांमध्ये जोनागुडा गावात चकमक सुरू झाली. ती जवळपास तीन तास सुरू होती.