धरमशाला : कसोटी क्रिकेटला प्राधान्य देण्याच्या भूमिकेला बळ देताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नव्या हंगामापासून कसोटी क्रिकेटला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूला सामन्याच्या मानधनाच्या बरोबरीने तिप्पट रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडवर अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवल्यानंतर ‘बीसीसीआय’ सचिव जय शहा यांनी ही घोषणा केली. एका हंगामात ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूस प्रत्येक सामन्यास ४५ लाख रुपये अतिरिक्त देण्यात येतील. याचाच अर्थ जो क्रिकेटपटू हंगामात साधारण १० कसोटी सामन्यात दिसेल, तो पूर्वीच्या सामना मानधनाच्या (प्रत्येक सामना १५ लाख) बरोबरीने आता अतिरिक्त ४.५० कोटी रुपये (प्रत्येक सामना ४५ लाख) मिळवेल. विशेष म्हणजे या क्रिकेटपटूंना वार्षिक करारपद्धतीतूनही निश्चित केलेली रक्कम मिळते. सचिव शहा यांनी या योजनेला कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना असे नाव दिले असून, ही रक्कम विद्यमान रकमेच्या पुढे जाऊन अतिरिक्त पोरितोषिक रक्कम म्हणून दिली जाईल, असे शहा यांनी सांगितले. ही कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना पूर्वलक्षी असून, २०२२-२३ हंगामात कसोटी क्रिकेटचा भाग असलेल्या क्रिकेटपटूंपासून ही योजना पात्र ठरेल. हेही वाचा >>>मुंबई इंडियन्सच्या नव्या गोलंदाजाची टी-२० मध्ये हॅटट्रिक, IPL पूर्वीच केला धमाका कशी असेल योजना या योजनेत एका हंगामात सरासरी ९ कसोटी सामने गृहीत धरले आहेत. एखादा खेळाडू ५० टक्क्यांपेक्षा कमी खेळला असेल (४ किंवा त्यापेक्षा कमी सामने) तर त्याला अंतिम अकरात असल्याबद्दल फक्त १५ लाख रुपये सामन्याचे मानधन आणि राखीव असल्यास अर्धी रक्कम मिळेल. म्हणजेच एखादा क्रिकेटपटू हंगामात ५० ते ७५ टक्के क्रिकेट खेळल्यास (हंगामातील नऊ सामने पकडून म्हणजे सहा सामने) त्याला एका हंगामाचे साधारण (सामन्याचे मानधन ९० लाख, अतिरिक्त प्रोत्साहन १.८० लाख) २.७० कोटी रुपये मिळतील. याखेरीज एका हंगामात एकदिवसीय सामन्यासाठी प्रति सामन्यास ८ लाख आणि ट्वेन्टी-२०च्या प्रति सामन्यास ४ लाख इतके मानधन मिळते.