गेल्या दोन वर्षांत शतक न साकारता आल्यामुळे टीकाकारांकडून मला सातत्याने लक्ष्य केले जात होते. परंतु या टीकेचा कोणताही परिणाम होणार नाही, याची मी काळजी घेतली, अशी प्रतिक्रिया भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केली.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ३१८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयात अनुक्रमे ८१ आणि १०२ धावांची खेळी साकारणाऱ्या रहाणेने महत्त्वाची भूमिका बजावली आणि टीकाकारांना आपल्या कामगिरीनिशी चोख प्रत्युत्तर दिले.

‘‘टीकेचा कोणताही परिणाम होणार नाही, यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. परंतु मी त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. शतक साकारल्यानंतर कुणालाही आनंद होणे स्वाभाविक आहे,’’ असे रहाणेने सांगितले.