गोलंदाजांनी शेवटच्या दिवशी केलेल्या चमकदार कामगिरीच्या आधारे विदर्भाने २५ वर्षांखालील कर्नल सी.के. नायडू करडंक (प्लेट ‘अ’ गट) क्रिकेट स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात केरळचा एक डाव आणि ७० धावांनी धुव्वा उडवला.
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाईन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केरळला पराभव टाळण्यासाठी २१२ धावांची आवश्यकता होती. मात्र वैदर्भीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर त्यांचा दुसरा डाव १४१ धावांतच आटोपला. विदर्भाच्या अश्विन हातेकरने ३० धावांत ३, तर आदित्य सरवटेने ३५ धावांत ३ गडी बाद करून विदर्भाचा विजय निश्चित केला. त्याआधी विदर्भाने दुसऱ्या डावात ५५१ धावा काढल्या. त्यात अभिषेक चौरसियाच्या ११२ धावांचा समावेश होता.
हा विजय मिळाल्यानंतरही विदर्भ १९ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. प्लेट ‘अ’ गटात रेल्वे (२६ गुण) व सौराष्ट्र (२२ गुण) हे संघ बादफेरीसाठी पात्र ठरले आहेत. केरळने २० गुणांसह तिसरे स्थान मिळवले. धावफलक असा : केरळ पहिला डाव सर्वबाद ३४०. विदर्भ पहिला डाव १४४.४ षटकांत सर्वबाद ५५१. केरळ दुसरा डाव ५४.५ षटकांत सर्वबाद १४१.