फटाक्यांनी भरलेलं फळ खायला दिल्यामुळे केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात एका गर्भवती हत्तीणीला आपले प्राण गमवावे लागले. २७ मे रोजी घडलेली ही घटना केरळमधील वन-विभागाच्या अधिकाऱ्याच्या फेसबूक पोस्टमुळे प्रसारमाध्यमांमध्ये आली. प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. राजकीय स्तरावरही याची दखल घेण्यात आली असून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भारतीय कुस्तीपटू गीता फोगाट हिने या प्रकरणी तीव्र शब्दात राग व्यक्त केला आहे. ही घटना पाहून असं वाटतंय की मानव जातीच्या पापांचा घडा भरतो आहे. संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे, असे रोखठोक मत तिने या प्रकरणी ट्विट केले आहे.

घडलेल्या प्रकाराबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही शोक व्यक्त केला आहे. विराटने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या घटनेचा निषेध व्यक्त केला असून प्राण्यांनाही प्रेमाची वागणूक मिळायला द्या, असं आवाहन केलं आहे. अनेक सेलिब्रिटींनी या प्रकाराबद्दल चीड व्यक्त केली असून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. हत्तीणीच्या मृत्यूसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी प्रसारमाध्यमांनी बोलताना दिली आहे.

वन-विभागानेही मारेकऱ्यांचा शोध सुरु केला असून दोषी व्यक्तींना लवकरात लवकर अटक केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. “नेमकी ही घटना कधी घडली हे सांगता येणार नाही, पण आमच्या अंदाजानुसार २० दिवसांपूर्वी हत्तीणीने हे फळ खाल्लं असावं. भुकेमुळे तिची झालेली अवस्था आणि वेदना सहन होत नसल्यामुळे ती ज्या पद्धतीने धावपळ करत होती यावरुन हा अंदाज बांधण्यात आला आहे”, असे केरळचे स्थानिक वन अधिकारी आशिक अली यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले.