भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील शेवटचा सामना पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळला होत आहे. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिल आणि कर्णधार शिखर धवन यांनी पहिल्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. दरम्यान, गिलने एक उत्तुंग षटकार मारला. त्याने मारलेल्या फटक्यामुळे चेंडू हरवला.

शुबमन गिलने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक केले. या खेळी दरम्यान त्याने १०४ मीटर लांबीचा एक षटकार ठोकला. या षटकारामुळे चेंडू हरवला आणि लवकर सापडलाही नाही. त्यामुळे पंचांनी दुसरा चेंडू बोलवून घेतला. गिलने डावाच्या १५व्या षटकात हेडन वॉल्शच्या चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेने हा षटकार ठोकला होता.

वृत्त लिहूपर्यंत पावसामुळे खेळ काही काळ थांबला आहे. खेळ थांबला तोपर्यंत भारताने २४ षटकात १ बाद ११५ धावा केल्या. शुबमन गिल ५१ आणि श्रेयस अय्यर दोन धावांवर नाबाद आहेत. कर्णधार शिखर धवनने ५८ धावांची खेळी केली. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताकडे २-० अशी विजयी आघाडी आहे.