भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा खेळू शकलेला नाही. गुडघ्याच्या दुखापतीमुळे जडेजा पहिल्या दोन सामन्यांतून बाहेर पडला आहे. तिसऱ्या सामन्यातही त्याच्या खेळण्याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे त्याच्या जागी श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमधून तो बाहेर पडला आहे. वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. त्या आधारावर पुढील निर्णय घेण्यात येईल. या दौऱ्यासाठी जाहीर रविंद्र जडेजाला उपकर्णधार करण्यात आले होते. तो जखमी झाल्यामुळे बीसीसीआयने श्रेयस अय्यरला उपकर्णधार केले आहे.

हेही वाचा – VIDEO : आशिया चषकासाठी प्रसारकांची जोरदार तयारी; स्टार स्पोर्ट्सने तयार केले थीम साँग

काही महिन्यांपूर्वीच दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतलेल्या रविंद्र जडेजाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन केले होते. तिथे त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. एजबस्टन कसोटी सामन्यात त्याने शतक झळकावले होते. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम झेल घेतल्याने जडेजा चर्चेत आला होता. पण, आता दुखापतीमुळे त्याला विंडीजविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर पडावे लागले आहे.