भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून आलं. कर्णधार विराट कोहलीच्या (७४) अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघानं पहिल्या दिवसाखेर ८९ षटकांत ६ बाद २३३ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वृद्धिमान साहा (९) आणि आर. अश्विन (१५) खेळत होते. विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला खेळपट्टीवर फार काळ जम बसवता आला नाही. चेतेश्वर पुजारा (४३) आणि अजिंक्य रहाणे (४२) यांनाही चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. विराट-अजिंक्यची जोडी पहिला दिवस खेळून काढेल असं वाटत असतानाच विराट कोहली ७४ धावांवर धावबाद झाला. अजिंक्य रहाणेनं मारलेला फटक्यावर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात कोहली धावबाद झाला. विराट कोहली बाद झाल्यानंतर भारतीय संघाची फलंदाजी ढासळली. विराट कोहलीनंतर रहाणे आणि हनुमा विहारीही लगेच बाद झाले. पुजारा बाद झाल्यानंतर रहाणे आणि कोहली यांच्यामध्ये भागिदारी होत होती. कोहली-रहाणे जोडीनं चौथ्या गड्यासाठी ८८ धावांची भागीदारीही केली. ७७व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर रहाणेने चेंडू समोर थोपावला. या चेंडूवर एक धाव घेण्याच्या उद्देशाने त्याने विराटला धावण्याचा इशारा केला. पण त्यानंतर रहाणेनं विराटला नकार दिला होता. तोपर्यंत विराट क्रीजच्या बाहेर आला होता. तेवढ्यात ऑस्ट्रलियन खेळाडूंनी चेंडू पकडला व स्टंपच्या दिशेने फेकला आणि विराट धावबाद झाला. Critical moment in the series? pic.twitter.com/fhuvIzfBSC — ICC (@ICC) December 17, 2020 विराट-अजिंक्यची जोडी पहिला दिवस खेळून काढेल असं वाटत असतानाच लॉयनच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात विराट धावबाद झाला. याआधी कसोटी क्रिकेटमध्ये २०१२ साली अॅडलेडच्या मैदानावर विराट अशाच पद्धतीने धावबाद झाला होता. १८० चेंडूत ८ चौकारांसह विराट कोहलीने ७४ धावांची खेळी केली. विराटला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने अनेक प्रयत्न केले, परंतू गोलंदाजांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेरीस भारतीय फलंदाजांमध्ये धाव घेताना झालेल्या गोंधळामुळे ऑस्ट्रेलियाला यश मिळालं. विराट कोहलीनंतर अंजिक्य रहाणे-विहारीही तंबूत परतले. त्यामुळे दिवसाखेर भारतीय संघानं ८९ षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात २३३ धावांपर्यंत मजल मारली आहे.