Virat say I were at a place where people didnt recognise us : आयपीएलच्या १७व्या हंगामातील सहावा सामना सोमवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरु येथे पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज आमनेसामने होते. ज्यामध्ये आरसीबीने पीबीकेएसचा ४ विकेट्सनी पराभव केला. यानंतर विराट कोहलीला त्याच्या शानदार अर्धशतकी खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी कोहलीने खुलासा केली की तो मागील काही दिवसापूर्वी आपल्या देशात नव्हता. तसेच तो जिथे त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत होता, तिथे त्याला लोक ओळखत नव्हते.

विराट कोहली आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळू शकला नाही. दरम्यान, त्याने कुटुंबासोबत चांगला वेळ घालवला. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात ७७ धावांची खेळी करून आरसीबीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर कोहलीने हे वक्तव्य केले. त्याने सांगितले की, कुटुंबासह बराच वेळ घालवून चांगले वाटत आहे.

विराट कोहली काय म्हणाला?

विराट कोहली म्हणाला, “आम्ही देशात (भारतात) नव्हतो. आम्ही अशा ठिकाणी होतो, जिथे लोक आम्हाला ओळखत नव्हते. मी दोन महिने माझ्या कुटुंबासह सामान्य माणसाप्रमाणे वेळ घालवला. एक कुटुंब म्हणून आमच्यासाठी हा एक अद्भुत अनुभव होता. मला माझ्या कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळाली याबद्दल मी देवाचा ऋणी आहे.”

हेही वाचा – IND vs AUS Test : भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ मैदानांवर खेळले जाणार पाच सामने

सर्वसामान्यांसारखे दैनंदिन जीवन जगणे हा एक अद्भुत अनुभव होता –

किंग कोहली पुढे म्हणाले, “आपल्याला कोणीही ओळखत नसताना सामान्य माणसाप्रमाणे रस्त्यावरून चालणे आणि सर्वसामान्यांसारखे दैनंदिन जीवन जगणे हा एक अद्भुत अनुभव होता.” १५ फेब्रुवारी २०२४ रोजी कोहली दुसऱ्यांदा वडील झाला, जेव्हा त्याची पत्नी अनुष्काने एका मुलाला जन्म दिला. या दोघांनी आपल्या मुलाचे नाव अकाय ठेवले आहे.

हेही वाचा – IPL 2024 : होळीच्या दिवशी किंग कोहलीने केली विक्रमांची उधळण! गब्बरला मागे टाकत माहीच्या विक्रमाशी साधली बरोबरी

विराट कोहलीने झळकावले ५१ वे अर्धशतक –

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या सामन्यात कोहलीने शानदार फलंदाजी केली. पंजाबने विजयासाठी दिलेल्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने चार चेंडू बाकी असताना रोहमर्षक विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने आयपीएल कारकीर्दीतील ५१वे अर्धशतक झळकावले. कोहलीने ४९ चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या. आरसीबीला शेवटच्या २४ चेंडूंमध्ये ४७ धावांची गरज होती, तेव्हा दिनेश कार्तिकने दहा चेंडूत नाबाद २८ धावा केल्या आणि ‘इम्पॅक्ट प्लेयर’ महिपाल लोमरोरने आठ चेंडूत नाबाद १७ धावा केल्या. तसेच कार्तिकने फिनिशरची भूमिका अतिशय चोख बजावली.