महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईवर ४४ धावांनी मात केली. विजयासाठी दिलेलं १७६ धावांचं लक्ष्य चेन्नईला पूर्ण करता आलं नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून चेन्नईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवत सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं होतं. दिल्लीचा संघ ७ गड्यांच्या मोबदल्यात १३१ धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सावध सुरुवात केली. परंतू अक्षर पटेलने वॉटसनला माघारी धाडलं आणि चेन्नईच्या डावाला गळती लागली. यानंतर मुरली विजय, ऋतुराज गायकवाड ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर केदार जाधव आणि फाफ डु-प्लेसिस यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू मधल्या षटकांत अपेक्षित धावगती राखण्याच हे फलंदाज अपयशी ठरले, ज्यामुळे चेन्नईसमोरचं आव्हान अधिक बिकट झालं. फाफ डु-प्लेसिस आणि केदार जाधव माघारी परतल्यानंतर धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतू त्यांचे प्रयत्नही तोकडे पडले. दिल्लीकडून कगिसो रबाडाने ३, नॉर्टजेने २ तर अक्षर पटेलने १ बळी घेतला. त्याआधी दुबईच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने दिल्ली कॅपिटल्सला १७५ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे एका क्षणाला मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत असताना दिल्लीचा संघ मधल्या षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांच्या जाळ्यात अकडला. मोक्याच्या क्षणी दोन विकेट गेल्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची फारशी संधी दिली नाही. नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने आजच्या सामन्यासाठी एन्गिडीच्या जागी जोश हेजलवूडला संधी दिली. परंतू शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दिल्लीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी करत चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. पृथ्वी शॉने यादरम्यान आपलं अर्धशतक साजरं केलं. ही जोडी दिल्लीसाठी मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असतानाच पियुष चावलाने शिखर धवनला माघारी धाडत दिल्लीची जोडी फोडली. तो ३५ धावा काढून माघारी परतला. यानंतर अर्धशतकवीर पृथ्वी शॉही चावलाच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला. ४३ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकारासह पृथ्वीने ६४ धावांची खेळी केली. ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही फलंदाजांमध्ये अर्धशतकी भागीदारीही झाली, परंतू मोक्याच्या षटकांत धावा करण्यात ते अपयशी ठरले. १९ व्या षटकाच्या अखेरीस कर्णधार श्रेयस अय्यर माघारी परतला. यानंतर स्टॉयनिस आणि पंत जोडीने दिल्लीला १७५ धावांपर्यंत मजल मारुन दिली. चेन्नईकडून पियुष चावलाने दोन तर सॅम करनने एक बळी घेतला.