रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर, भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर मात करत मालिकेत विजयी आघाडी घेतली. सुपरओव्हरमध्ये हा सामना जिंकत, भारताने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा टी-२० सामन्यांची मालिका जिंकली. आश्वासक कामगिरी करुनही न्यूझीलंडला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर न्यूझीलंडचे क्रीडामंत्री ग्रँट रॉबर्टसन यांनी सुपरओव्हरवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरओव्हरवर न्यूझीलंडची कामगिरी खराब राहिलेली आहे. आतापर्यंत न्यूझीलंडने ७ वेळा सुपरओव्हर खेळली असून यातील ६ सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे. केवळ एका सामन्यात न्यूझीलंडचा संघ जिंकला होता.

टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये ३ वन-डे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत न्यूझीलंडचा संघ कसं पुनरागमन करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.