यंदा होणारा आशिया कप अधिकृतपणे पुढे ढकलण्यात आला आहे. आता ही स्पर्धा २०२३मध्ये आयोजित केला जाईल. यावर्षी जून महिन्यात आशिया कपचे श्रीलंकेत आयोजन करण्यात आले होते. मात्र करोनाचे संकट पाहता आशिया क्रिकेट काउन्सिलला (एसीसी) ही स्पर्धा स्थगित करण्याची घोषणा केली. मागच्या वर्षी ही स्पर्धा पाकिस्तानात होणार होती. मात्र तेव्हाही ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती.

यूएईत होणार IPLच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन ?

एसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, करोनामुळे होणारे धोके आणि निर्बंध लक्षात घेता एसीसी कार्यकारी मंडळाने आशिया चषक २०२१पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी स्पर्धा आयोजित करण्यासाठी एसीसीने सहभागी आणि भागीदारांसह काम केले.

एसीसीने पुढे म्हटले, “व्यस्त एफटीपीमुळे यंदा या स्पर्धेसाठी कोणतीही विंडो उपलब्ध नाही. या कारणास्तव मंडळाला आशिया चषक स्पर्धेचा हा हंगाम पुढे ढकलावा लागला आहे. आता हा हंगाम २०२३मध्ये होईल, कारण २०२२मध्येही आशिया कप होणार आहे. भविष्यात स्पर्धेची तारीख निश्चित होईल.”

यापूर्वी आशिया कप मागील वर्षी सप्टेंबरमध्ये होणार होता, पण करोनामुळे तो २०२१मध्ये पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताने आतापर्यंत ७ वेळा आशिया कपवर नाव कोरले आहे. १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६ आणि २०१८ साली भारताने आशिया कप जिंकला आहे. २०१८ मध्ये आशिया कपचे आयोजन यूएईत करण्यात आले होते. २०१८ साली भारताने बांगलादेशला नमवून ही स्पर्धा आपल्या नावावर केली होती.

‘‘आता शूज चिकटवायची गरज नाही”, क्रिकेटपटूच्या विनंतीनंतर ‘ही’ कंपनी मदतीला धावली