नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांतील मतांची अंतिम टक्केवारी मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केली. १०२ मतदारसंघांचा समावेश असलेल्या पहिल्या टप्प्यामध्ये ६६.१४ टक्के, तर ८८ मतदारसंघांच्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये ६६.७१ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये दोन्ही टप्प्यांमध्ये अनुक्रमे ६९.५८ टक्के व ६९.४५ टक्के झाले होते. यंदा मतांमध्ये अनुक्रमे ३.४४ टक्के व २.७४ टक्क्यांची घसरण झाली.
महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यांमध्ये अनुक्रमे ६३.७१ टक्के व ६२.७१ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये अनुक्रमे ६३.०४ टक्के व ६२.८५ टक्के मतदान झाले होते. या वेळी पहिल्या टप्प्यामध्ये ०.६७ टक्क्यांची वाढ झाली असली तरी दुसऱ्या टप्प्यात मतांमध्ये ०.१४ टक्के घट झाली आहे. २०२४ मध्ये दोन टप्प्यांमध्ये सरासरी ६३.२१ टक्के मतदान झाले, तर २०१९ मध्ये सरासरी ६२.९४ टक्के झाले होते. त्यामुळे या वेळी पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मतांच्या सरासरी टक्केवारीत ०.२७ टक्के वाढ झाली आहे. देशभरात दुसऱ्या टप्प्यामध्ये मणिपूरमध्ये ८४.३५ टक्के मतांचा उच्चांक, तर उत्तर प्रदेशात ५५.१९ टक्क्यांचा नीचांक नोंदवला गेला.