ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरीला पुसून टाकताना भारताच्या विकास गौडाने आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेत गुरुवारी सोनेरी ‘विकास’ साधण्याची किमया साधली. स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशी साऱ्या भारतीयांच्या अपेक्षांची पूर्तता करीत विकासने थाळीफेकीत सुवर्णपदक प्राप्त केले. याचप्रमाणे भारताच्या एम. आर. पुवम्माने महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकत रुपेरी कामगिरी नोंदवली. भारताच्या रतीराम सैनी याने दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदकाची कमाई केली. स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशी यजमान भारताने प्रत्येकी एकेक सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक मिळवत आपल्या खात्यावरील पदकांची संख्या एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यसहित पाचपर्यंत पोहोचवली आहे. दरम्यान, चीनच्या सू बिंगतियान व वेई योंगली यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात वेगवान धावपटूचा मान मिळविला.
मॉस्कोत होणाऱ्या जागतिक स्पर्धेचे तिकीट यापूर्वीच निश्चित करणाऱ्या गौडाने चौथ्या प्रयत्नात ६४.९० मीटपर्यंत थाळी फेकली. शुक्रवारी तो ३१व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. पण त्याने आदल्या दिवशीच आपला वाढदिवस सुवर्णपदकाची कमाई करून जल्लोषात साजरा केला. या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळविणारा तो चौथा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी प्रवीण कुमार (१९७५), अजित बहादुरिया (१९९३), अनिलकुमार (२०००) यांनी हा मान मिळविला आहे. म्हैसूर येथील खेळाडू विकास हा गेली काही वर्षे अमेरिकेत प्रशिक्षण घेत आहे.
पुवम्मा हिने आशियाई ग्रां.प्रि स्पर्धाच्या मालिकेत लागोपाठ तीन स्पर्धामध्ये ४०० मीटर धावण्याची शर्यत जिंकली होती. तिला चीनच्या झाओ यानमिन हिला मागे टाकता आले नाही. झाओ हिने ही शर्यत ५२.४९ सेकंदात जिंकली. पुवम्माला ही शर्यत पार करण्यास ५३.३७ सेकंद वेळ लागला. लेबाननच्या तासलिकियान गेरेटा हिने कांस्यपदक मिळविताना हे अंतर ५३.४३ सेकंदांत पार केले.

‘‘आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा भारतीय मैदानावर होत असल्यामुळे घरच्या प्रेक्षकांसमोर धावताना थोडेसे दडपण होते. मात्र शेवटच्या टप्प्यात मी सातत्यपूर्ण धाव घेत रौप्यपदक मिळविले. या स्पर्धेत पदक मिळविण्याचे माझे स्वप्न साकार झाले आहे. कारण प्रथमच मी चीनच्या खेळाडूशी झुंज देत होते. त्याचेही थोडेसे दडपण आले होते. गेली दोन वर्षे मी आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाकरिता सराव करीत आहे. त्याचा फायदा मला या पदकासाठी झाला.’’-एम. आर. पुवम्मा

अनिरुद्ध गुजर उपांत्य फेरीत बाद
भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनिरुद्ध गुजर या महाराष्ट्राच्या खेळाडूचे १०० मीटर धावण्याच्या शर्यतीमधील आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. या शर्यतीत ७० मीटर अंतरापर्यंत तो चौथ्या स्थानावर होता. मात्र नंतर तो मागे पडला  व पाचव्या क्रमांकावर फेकला गेला. ही शर्यत पार करण्यास त्याला १०.५९ सेकंद वेळ लागला. या फेरीच्या प्रारंभी चार-पाच वेळा वेगवेगळ्या खेळाडूंकडून चुका झाल्या. त्यामुळे ही शर्यत प्रत्यक्षात सुरू होण्यास २५ मिनिटे वेळ लागला.

तांत्रिक चुकीमुळे शारदा बाद
महिलांच्या १०० मीटर शर्यतीत चूक केल्यामुळे भारताच्या शारदा नारायण हिला उपांत्य फेरीतच बाद व्हावे लागले. तिने सुरुवातीलाच मार्ग बदलल्यामुळे तिला स्पर्धेतून बाद करण्यात आले. भारताची अन्य धावपटू आशा रॉय हिचे आव्हानही प्राथमिक फेरीत संपुष्टात आले. प्राथमिक फेरीत पाचवा क्रमांक मिळविताना तिला हे अंतर पार करण्यास ११.९४ सेकंद वेळ लागला.