मानसी जोशी, शामल भंडारे प्रामाणिकपणा, वेड आणि मेहनत ही त्या त्या व्यक्तीला वेगळी ओळख देऊन जातात. यातूनच अनेक जण स्वत:ची अमीट छाप उमटवतात. कलाजीवनात येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करून ते यशस्वी होतात. अशाच कलासक्त काही तरुण-तरुणींविषयी.. धन्य ते गायनीकळा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची शिष्या आणि संगीत क्षेत्रातील ज्ञान असणाऱ्या अशा मंजुश्री ओक हिने ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये सलग १२ तास गाण्याचा विक्रम केलेला आहे. या विक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे आशाताईंची सुमारे १२१ गाणी सलग न थांबता गायली. ५ जुलै २०१७ रोजी मंजुश्री ओकने सलग १२१ गाणी गाण्याचा विक्रम ‘अशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये केला. सलग बारा तास गाणी गाणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. अभंगापासून गझल, कॅब्रेपर्यंत सुमारे चार ते पाच भाषांमधून गाऊन मंजुश्री ओकने संगीतक्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे. पद्मनाभ यांच्याकडून विक्रम करण्याची कल्पना मंजुश्रीला सुचली. गाण्याचा हा विक्रम गुरू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना समर्पित केला आहे, असे मंजुश्रीने सांगितले. खूप मोठय़ा प्रमाणात श्रोतावर्ग या विक्रमाच्या वेळेस उपस्थित होता. पंधरा तास सलग गाणे गाण्याच्या विक्रमाचे श्रेयदेखील मंजुश्रीने तिच्या सहकाऱ्यांना आणि पाठीशी उभे राहणाऱ्या कुटुंबाला दिले आहे. टॅटू म्हणजे स्वप्नांचे प्रतिबिंब काही भन्नाट व्यक्तिमत्त्वांपैकी मुंबईची तेजश्री प्रभूलकर होय. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षांपासून शरीरावर गोंदण्याचे म्हणजेच टॅटू काढण्याचे वेड मनात होते. अनेक अडथळे पार करत तेजश्री पहिली टॅटू काढणारी भारतीय महिला ठरली. तिचे नाव ‘एशियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदवले गेले. पेशाने टॅटू कलाकार असलेल्या तेजश्रीच्या शरीरावर वयाच्या विसाव्या वर्षांपर्यंत जवळपास पंचवीस टॅटू होते आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी अवघ्या एका महिन्यात तिने शरीरावर ७५ टॅटू गोंदवून घेतले. टॅटू आर्टिस्ट तेजश्री हिच्या शरीरावर सध्या सुमारे १०३ टॅटू आहेत. बी.एम.एम. या पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षांला असतानाच महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यात सोडून ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचा निर्णय तेजश्रीने घेतला. तेजश्रीच्या डोक्यातील या टॅटूजच्या वेडाने खुद्द तेजश्रीलाच समाजाकडून, घरातून एवढेच नव्हे तर अगदी मित्रमंडळींकडूनपण वेडे ठरविण्यात आले होते. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ यात नोंदणी करण्यापासून ते अंतिम निकाल येईपर्यंत तेजश्रीने खूपच मारा सहन केला. शरीरावर टॅटू काढणे हादेखील एक अतिशय सुंदर कलेचा एक भाग आहे, हे समाजाला सांगणे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत यामागची सुंदरता पोहोचवणे हा तेजश्रीचा प्राथमिक उद्देश होता. मी गोंदलेल्या टॅटूंपैकी एकही टॅटू म्हणजे सहज काढलेली वायफळ नक्षी नाही, तर प्रत्येक नक्षीला एक विशिष्ट अर्थ आहे. माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि स्वप्नांचं प्रतिबिंब आहे, असं तेजश्री सांगते. शिवरायांचे ‘मोझॅक’ जे. जे. कला महाविद्यालयात शिकणाऱ्या चेतन राऊत या तरुणाने तब्बल पंचाहत्तर हजार सीडींचा वापर करून शिवरायांचे चित्र साकारले आहे. या कलाकृतीची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली. सीडीपासून तयार केलेले हे जगातील सर्वात पहिले ‘मोझॅक’ चित्र आहे. ११ मजली इमारतीएवढी उंची असलेल्या या कलाकृतीत ३६ रंगसंगतीचा वापर केलेला आहे. हे चित्र त्रिमितीय झाले आहे. २०१७ रोजी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून भांडुप येथील संभाजी महाराज मैदानात शिवाजी महाराजांचे ११० फूट लांबी आणि ९० फूट रुंदीचे चित्र साकारले होते. चेतनच्या चित्रांचे वैशिष्टय़ असे की, त्याची चित्रे ही टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेवर आधारित असतात. त्याची चित्रे कॅसेट, की-बोर्ड्स, सीडी आणि माऊस या साहित्यापासून बनलेली आहेत. अशा साहित्याचा वापर करून साकारलेल्या चित्रास ‘मोझॅक किंवा पिक्सेल’कला असेही म्हणतात. अशीच त्याने पाच विविध चित्रं काढलेली आहेत. मला जागतिक विक्रम नोंदवायचा हे माझ्या मनात होते. कलेला तंत्रज्ञानाची जोड देत ही कलाकृती बनवली. यामागे मोझॅक आणि पिक्सेल कलेचा भारतात प्रसार व्हावा हा यामागचा मुख्य उद्देश होता. कलेद्वारे त्याने शिवरायांच्या कर्तृत्वाला वंदन केले आहे. शिवरायांची कलाकृती बनविण्यासाठी सात लाख एवढा खर्च आला. स्थानिक आमदारांनी मला यासाठी अर्थसाहाय्य केले. ९२ वर्षांची विद्यार्थिनी.. शाळेची पायरीही न चढलेल्या आजींची शाळा मुरबाड तालुक्यातील फांगणे गावात रोज भरते. या शाळेतील विद्यार्थी ६० ते ९२ वर्षे वयाचे आहेत. मोतीराम दलाल समाजसेवी संस्थेच्या वतीने ही आजींची शाळा चालवली जाते. या शाळेत सर्वात ज्येष्ठ विद्यार्थी ९२ वर्षे वयाच्या सीताबाई देशमुख आहेत. शाळेची संकल्पना योगेंद्र बांगर यांची आहे. व्यवसायाने शिक्षक असलेले बांगर यांनी हॉर्टिकल्चर या विषयात पदवी घेतली आहे. त्यांच्या या कार्याची दखल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद करण्यात आली आहे. ८ मार्च २०१६ रोजी या शाळेची स्थापना करण्यात आली. आज या शाळेत ३० आजी शिक्षण घेत आहेत. त्यांना गुलाबी रंगाची साडी दप्तर, पाटी आणि पेन्सिल देण्यात आली आहे. उपक्रम सुरू करण्यापूर्वी शाळेमार्फत गावात शौच खड्डे, वृक्षरोपांची लागवड, पर्जन्यजल संधारण यासारखे उपक्रम राबवले गेले. यामुळे गावकऱ्यांच्या मनात विश्वास आणि आपुलकीचे नाते निर्माण झाले. यामुळे शाळा सुरू केल्यावर आदिवासी लोकांचा पाठिंबा मिळला, असे शाळेच्या शिक्षिका शीतल मोरे यांनी सांगितले. नातवांना शाळेत जाताना बघून आम्हालापण शिकता आले असते तर बरे झाले असते, अशी खंत आजींनी माझ्याजवळ व्यक्त केली. यातूनच आजीबाईंची शाळा या उपक्रमाचा जन्म झाला. आयुष्यभर चूल आणि मूल सांभाळणाऱ्या आजी आता स्वत:चे नाव लिहितात, बेरीज आणि वजाबाकी करतात याचबरोबर आमच्या आजीबाई आनंदी राहतात हेच या शाळेचे यश आहे, असे बांगर यांनी सांगितले.