‘सत्याग्रह’, ‘कॉमन मॅन’, ‘लँडमाफिया’ यांसारख्या कादंबऱ्यांमुळे बबन िमडे हे नाव आता मराठी साहित्यजगताला परिचित झाले आहे. ‘पाकुळी’ या त्यांच्या ताज्या पुस्तकाकडे वळण्यापूर्वी त्यांच्या काही पुस्तकांची ओळख असायला हवी. मुळशी सत्याग्रहाच्या पाश्र्वभूमीवरील त्यांच्या कादंबरीत्रयीमधील ‘सत्याग्रह’ ही पहिली कादंबरी प्रकल्पग्रस्तांची, आजच्या शेतकऱ्यांच्या विदारक वास्तवाची जाणीव करून देते. तर जागतिकीकरणाने सगळाच समाज ढवळून निघाला आहे. त्यात शेतकऱ्यांची जी दुर्दशा झाली तिची भयानक झलक ‘लँडमाफिया’ या कादंबरीत अनुभवायला मिळते. आतापर्यंतच्या िमडेंच्या कादंबऱ्या मातीशी नाते सांगणाऱ्या. यातील माणसांचे पाय मातीत घट्ट रोवलेले आहेत. ‘कॅप्टन कावेरी’ मात्र थेट ‘मंगळावर’ जाते. मराठी बालकुमार साहित्यात नायक खूप झाले; पण िमडेंनी कावेरीच्या रूपाने नायिका दिली. तीही- वैज्ञानिक प्रश्न पडणारी, कुतूहल असणारी, प्रयोग करणारी. विलक्षणच! ‘ललित’ मासिकातील एका लेखात या कादंबरीचे आपण काही भाग लिहिणार असल्याचे िमडेंनी जाहीर केले होते. परंतु कल्पनेची भरारी घेणाऱ्या िमडेंची पुन्हा जमिनीवरची बाल-कुमारांसाठीची कादंबरी अवचित अवतरली.. ‘पाकुळी.’ अनपेक्षित! अकल्पित! कधी कधी सत्य हे कल्पितापेक्षाही अद्भुत असते, हेच खरे! ‘पाकुळी’ या कादंबरीत रस्त्यावर, फूटपाथवर, पुलांखाली जगणाऱ्या मुलांचे भीषण वास्तव वाचायला मिळते. स्वातंत्र्य मिळून ७० वष्रे झाली तरी एक विशिष्ट वर्ग आजही लाचारीचे जिणे जगतो आहे. सिग्नलवर भीक मागणाऱ्यांकडे पाहिले की त्याचे दर्शन घडते. या रस्त्यावरच्या मुलांचे दैनंदिन जीवन, ऊन-पाऊस-थंडी या चक्रातली त्यांची घालमेल, पोटापायी होणारी परवड यात या मुलांचे बालपण करपते. वाढत्या वयात चोरी, अनतिक गोष्टी यांमुळे गुन्हेगारीचा शिक्का बसतो. मग तोच शिक्का घेऊन आयुष्य कंठणारा हा वर्ग सुखवस्तू जीवन जगणाऱ्या इतरांना मात्र गंभीर, उग्र समस्या वाटायला लागतो. या छोटय़ा कादंबरीत अशा अनेक गोष्टींना िमडेंनी स्पर्श केला आहे. या मुलांसाठी काम करणाऱ्या आणि त्यासाठी नोबेल पारितोषिक मिळालेल्या कैलाश सत्यार्थीची आठवण ही कादंबरी वाचताना हटकून होते. मात्र, ही कादंबरी केवळ समस्या सांगत नाही. जगणे मुश्किल आहे म्हणून कोणी स्वप्न पाहणे सोडत नाही. स्वप्न पाहायला पसे लागत नाहीत. या कादंबरीतील नायिका पाकुळीही असेच एक स्वप्न बघते. ते इतरांपेक्षा फार वेगळे आहे. आणि तेच वाचकाला कादंबरीत गुंतवून ठेवते.. ओढ लावून पुढे खेचत नेते. घर नसलेली पाकुळी पुलाखाली राहते. आई-वडिलांचा पत्ता नाही. ज्यांच्या आधाराने ती राहते तेच आता तिच्या जिवावर जगतात. त्यासाठी तिला भीक मागायला लावतात. फुगे, खेळणी विकायला भाग पाडतात. तिच्याकडून लोकांनी जास्त फुगे घ्यावेत म्हणून पोरपणीच साडीचा पोंगा तिच्यावर बळजबरीने लादतात. हे सगळे फार फार करुण आहे. पत्थरालाही पाझर फुटावा असे आहे. पाकुळीने हे सगळे ओझे स्वीकारले आहे. या ओझ्याच्या गुदमरून टाकणाऱ्या भाराखालीच वावरताना ती एक स्वप्न बघते. ते खरे करण्यासाठी जवळच्या पिशवीत ती काहीतरी जिवापाड सांभाळत राहते. तिची पिशवी लपवण्याची धडपड आपल्याला अस्वस्थ करते. त्याचबरोबर त्या पिशवीत काय असेल याविषयीची उत्सुकताही वाढते. ही उत्सुकता लेखक िमडेंनी शेवटपर्यंत टिकवली आहे. शेवटी त्या पिशवीत काय आहे हे जेव्हा आपल्याला कळते तेव्हा मात्र एका भयंकर वास्तवाची जाणीव होते. या देशात एक समाज सुखवस्तू जीवन जगत आहे, तर पाकुळीसारखी एक कोवळी मुलगी मात्र साध्या साध्या गोष्टींसाठी झगडते आहे, धडपडते आहे. त्या प्रत्यक्षात मिळत नाहीत तेव्हा त्या स्वप्नात तरी मिळाव्यात, ही तिची असोशी आहे. यातील विरोधाभास आपल्याला अंतर्मुख करतो. सुन्न करतो. त्यामुळे ही पाकुळी आपल्या मनात घर करून राहते. नावाने पाकुळी; पण व्यवस्थेने, परिस्थितीने पंख छाटलेले.. अशा अवस्थेत पाहिलेल्या स्वप्नाचाही चक्काचूर झालेली पाकुळी! पाकुळीसारखेच रघू हे पात्रही एक वेगळेच त्रासदायक वास्तव मांडते. रघूचे सवंगडी लक्ष वेधून घेणारेच आहेत. विशेषत: बालसुधारगृहात असताना रघूचा जो विकास होतो त्याचे चित्रण अधिक मनोवेधक आहे. त्याने लिहिलेल्या रोजनिशीतील काही पाने व त्याने काढलेली चित्रे तर कमालीची हृदयस्पर्शी आहेत. त्यातून दिसणारे हृदयद्रावक वास्तव व कल्पनारम्य स्वप्न यांच्यामधील ताणाचे आलेखन अंत:करण गलबलून टाकणारे आहे. ‘शिकलं तर खरंच माणूस मोठा होतो का?’ हा रोकडा सवाल किंवा देवांचे रूप (सोंग) घेऊन जगताना, रामलीला दाखवताना त्यांना देव केवळ ‘पोट भरण्याचे मामुली साधन’ वाटते. ‘१५ ऑगस्ट’ झेंडे खूप विकले जातात म्हणूनच केवळ त्यांना महत्त्वाचा वाटतो. यातला जाळता-पोळता जीवनप्रत्यय गलबलून टाकणाराच नाही काय? ‘पाकुळी’तील शेवटच्या परिच्छेदातील काही ओळी येथे उद्धृत कराव्यात असे वाटते- ‘‘.. मला पुन्हा रघूची वही, मंगळागौरीचा खेळ आणि त्यातलं गाणं आठवल्याशिवाय राहणार नाही. नखुली. आता रघूसारखीच जेव्हा पाकुळीची आठवण होईल तेव्हा मलाही नखुली आठवेलच. लहानपणी मुक्त उडणाऱ्या राणी पाकुळीच्या मागे पळताना केवढा आनंद व्हायचा! ती बोटात सापडली की तिचे रंग मी कितीतरी वेळा पाहत राहायचो. त्या पाकुळीचं सौंदर्य तिच्या रंगांत होतं हे तिलाही माहीत असावं, म्हणूनच तर ती आपल्या रंगांसह सतत आनंदानं उडत असावी आणि आम्हाला वेड लावत असावी. ही पाकुळी मात्र मला त्या पाकुळीसारखी आनंदानं उडताना कधीच दिसली नाही. ती तिच्या आनंदासाठी धडपडत होती. हा आनंद ती ज्यात गोळा करत होती ती पिशवी जिवापाड जपत होती. पण ज्या फूटपाथवर तिला आनंदानं उडय़ा मारायच्या होत्या, त्याच फूटपाथवर आज तिचा आनंद आम्हीच (म्हणजे समाजाने) आमच्या (आपल्या) पायाखाली तुडवला.’’ ही कादंबरी अशी अनेक अंगांना स्पर्श करीत सगळे चित्र एखाद्या गतिमान चित्रपटासारखे आपल्या डोळ्यांसमोर उभे करते. यातून मिंडेंमधील कादंबरीकाराचे सामथ्र्य कळते. याचे ढळढळीत प्रत्यंतर येते ते कादंबरीतील निवेदकाच्या माध्यमातून. तो एक पत्रकार आहे. तो सहज सगळीकडे वावरतो. सहज सगळे निरखतो. सहज त्यात गुंतत जातो. सहज त्यातून बाहेर पडतो. भावगदगदही होतो आणि शांतपणे विचारही करतो. कादंबरीत त्याचे म्हणून जे निवेदन आहे, त्यातून त्याचे सहृदय साक्षीत्व आणि अलिप्त तादात्म्य जाणवते. त्यामुळे कादंबरी वरच्या पातळीवर जाते. तिला अभिजात उंची मिळते. परिणामी (‘कॅप्टन कावेरी मंगळावर’प्रमाणेच) पाकुळीही केवळ बालकुमारांनीच नव्हे तर मोठय़ांनीही आवर्जून वाचावी अशी दखलपात्र साहित्यकृती वाटते. ‘पाकुळी’- बबन मिंडे, अक्षरसारस्वत प्रकाशन, पृष्ठे- ७९, मूल्य- १०० रुपये.