आशावादी दृष्टिकोन आणि मनात सतत सकारात्मक विचार ठेवल्यामुळे दीर्घायुष्य लाभू शकते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. ज्या महिला सतत आशावादी दृष्टिकोन ठेवून समाजात वागत असतात, त्या इतरांच्या तुलनेत जास्त दिवस जगतात. त्यांना कर्करोग, हृदयरोग, झटका, श्वसनसंबंधित आजार, संसर्ग होण्याचे प्रमाण हे अतिशय कमी असते, असे अभ्यासात आढळून आले आहे. सध्या वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य यांच्या माध्यमातून आजार होण्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यासोबतच मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे, अमेरिकेच्या हार्वर्ड द चॅन सार्वजनिक आरोग्य स्कूलचे संशोधक एरिक किम यांनी म्हटले आहे. आपण आशावादी दृष्टिकोन ठेवल्यामुळे आपले आयुष्य बदलू शकतो. आयुष्यातील अनेक संकटांना सकारात्मकतेने सामोरे जाण्यास शिकले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. आशावादी राहणे आणि मृत्यू येणे याचा संबंध असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. जास्त आशावादी राहिल्याने आपल्या जैविक प्रणालीवर परिणाम घडून येतो. तसेच आशावादी राहण्यामुळे अनेक आजार होत नसल्याचे अभ्यासात आढळून आले. हा अभ्यास करण्यासाठी २००४ ते २०१२ पर्यंत ७० हजार महिलांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. प्रत्येक दोन वर्षांनी याबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये महिलांचा आशावादी दृष्टिकोन आणि इतर घटक यांचा मृत्यू येण्यासाठी असणाऱ्या धोक्याबाबत संशोधन करण्यात आले. ज्या महिला सतत सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या होत्या, त्यांना मृत्यूचा धोका इतरांच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी होता. या महिलांना कर्करोग होण्याचा धोका १६ टक्के, हृदयरोगाचा धोका ३८ टक्के, श्वसनसंबंधित आजार होण्याचे प्रमाण ३८ टक्के आणि संसर्ग होण्याचा धोका ५२ टक्क्यांनी कमी असल्याचे अभ्यासात आढळून आले. (टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)