आंबट-गोड आणि भरपूर प्रमाणात पोषक घटक असणारी टप्पोरी हिरवी, काळी द्राक्ष उन्हाळ्यात खायला प्रचंड सुंदर लागतात. चवीपुरतं एक द्राक्ष खाताना संपूर्ण घड कधी संपवला जातो आपल्याला कळतसुद्धा नाही. पण, हीच द्राक्ष जर तुम्ही न धुता खात असाल, तर मात्र तुम्हाला त्यांच्या घातक परिणामांपासून सावध राहावे लागेल.

सध्या सोशल मीडियावर द्राक्ष न धुता खाल्ल्यास, त्या फळांवर फवारलेल्या कीटकनाशकांमुळे, रसायनांमुळे इतकेच नाही तर फळांच्या लागवडीच्या पद्धतींमुळे विविध जीवाणूंचा आपल्याला धोका असू शकतो, असे सांगणारे अनेक व्हिडीओ फिरत आहेत. दरम्यान, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील फूड ब्लॉगर वाणी शर्माने तिच्या अकाउंटवरून द्राक्ष कशी धुवायची आणि कशी साठवायची याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : स्त्रियांनो, ‘PCOS’ चा त्रास कसा कराल कमी? आराम मिळण्यासाठी समजून घ्या तज्ज्ञांनी सुचविलेली ही पाच आसने

यामध्ये द्राक्षांवरील रसायनांचा किंवा वॅक्सचा पांढरा थर घालवण्यासाठी आधी द्राक्षे पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवली. नंतर त्यामध्ये व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घालून द्राक्षांना त्या पाण्यात १५ मिनिटे भिजवून ठेवले. शेवटी त्या द्राक्षांना साध्या पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ धुण्यास सांगितले. परंतु, असे करण्याने खरंच काही फायदा होतो का, याबद्दल ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने फिटनेस आणि पोषणतज्ज्ञ, रिया श्रॉफ एखलास यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी काय सांगितले ते पाहू.

द्राक्ष, सोडा आणि व्हिनेगरने धुतल्यास खरंच फायदा होतो का?

“न धुतलेली द्राक्ष खाण्याने त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो”, असे म्हणत रियाने द्राक्ष धुवून खाण्यावर भर दिला आहे. “ही फळं पाण्याने स्वच्छ धुवून खाल्ल्यास त्यावर असलेल्या जंतूंचा, मातीचा किंवा कीटकनाशकांचा धोका आपल्यासाठी कमी होतो. तसेच त्यावर लागलेले घातक घटकदेखील आपल्या पोटात जात नाहीत”, असे बॉडी फिट टीव्ही आणि द डाएट चॅनेलच्या संस्थापक रिया यांनी सांगितले.

द्राक्ष धुण्याची योग्य पद्धत कोणती? [what is the right way to wash grapes]

सध्या काही जण द्राक्ष मीठ आणि व्हिनेगर मिश्रित पाण्यात भिजवून त्यानंतर खाणे पसंत करत आहेत. याबद्दलच्या वादावर आणि त्याच्या गरजेवर सहमती दर्शवत रिया म्हणते की, “बेकिंग सोडा द्राक्षावरील नको असलेले घटक काढून टाकण्यास मदत करू शकतो. तसेच व्हिनेगरदेखील त्यावरील जीवाणूंचा सामना करण्यास फायदेशीर ठरू शकतो. मात्र, या पद्धतीचा खरंच किती उपयोग होतो याबद्दल अद्याप कोणताही वैज्ञानिक पुरावा समोर आलेला नाहीये. खरंतर नळाखाली आपण जेव्हा फळे धुतो, तेवढ्यानेदेखील फळांवरील जंतू किंवा अनावश्यक घटक काढून टाकण्यास मदत होऊ शकते”, अशी माहिती रियाने दिली असल्याचे समजते.

हेही वाचा : मलाईकासुद्धा रोज करते योगा; शरीर, मन अन् भावनांसाठी ‘यामुळे’ योगासने ठरतात फायदेशीर, पाहा…

मात्र, खाण्यापूर्वी फळांना धुण्याबाबत तुम्ही फार सावधगिरी बाळगणारे असल्यास खास फळे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांचा वापर करू शकता, असा सल्ला रियाने दिला आहे. मात्र, तरीही फळे पाण्याने धुणे तितकेच गरजेचे आणि महत्त्वाचे आहे.

फळे कशी साठवून ठेवावी?

“फळे धुतल्यावर त्यामध्ये पाण्याचा ओलावा राहिल्यास त्यांना बुरशी येऊ शकते. फळे सडून खराब होऊ शकतात. असे होऊ नये यासाठी फळं धुवून झाल्यावर त्यावरील पाणी एखाद्या कापडाने टिपून घ्या किंवा त्यांना थोडावेळ मोकळ्या हवेवर वाळू द्यावे. त्यानंतर एखाद्या डब्यात ती साठवून ठेवा”, असा सल्ला रियाने दिला आहे.

“डबा पूर्णतः हवाबंद नसेल याची काळजी घ्या. फळे ठेवलेल्या डब्यात थोडी खेळती हवा असल्यास ती ताजी राहण्यास मदत होते. मात्र, गरजेपेक्षा जास्त हवा फळांना वळवू शकते. छिद्र असलेले प्लास्टिक कंटेनर किंवा हलके बंद झाकण असलेले कंटेनर यासाठी उत्तम पर्याय आहेत. असे केल्याने ती फळे फ्रीजमध्ये सर्वात जास्त काळासाठी साठवली जाऊ शकतात. मात्र, उत्तम चवीसाठी त्यांना लवकरात लवकर खाणे योग्य ठरते.”