अरिजीत तालापात्रा भारतातील ७० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ग्रामीण भागांमध्ये राहते, त्यामुळे कोणत्याही ब्रॅण्डसाठी आपला ग्राहकवर्ग निर्माण करण्याच्या आणि वाढवण्याच्या दृष्टीने ग्रामीण भारत महत्त्वाचा असणे अतिशय स्वाभाविक आहे. सामाजिक आणि आर्थिक विकासाची गंगा ग्रामीण बाजारपेठांमध्येदेखील झिरपू लागली आहे. शिवाय आज ग्रामीण ग्राहकाला माहिती मिळवण्याची अनेक माध्यमे सहजपणे उपलब्ध आहेत, साहजिकच ते अधिक जास्त शिक्षित आणि उत्पादनांविषयी अधिक जास्त जागरूक बनत आहेत. महामारीमुळे डिजिटल माध्यमांचा वापर वाढला, वेगवेगळे कन्टेन्ट पाहण्यासाठी ग्रामीण भागातील ग्राहक ऑनलाइन प्लॅटफॉम्र्सकडे वळले असल्याचे चित्र मोठय़ा प्रमाणावर दिसून येत आहे. त्याबरोबरीनेच ऑनलाइन खरेदीचे तंत्रदेखील ते अवगत करून घेत आहेत. असे असले तरी, ‘आयटेल’ने नुकतेच केलेले एक सर्वेक्षण आणि सीएमआर अहवालानुसार, जवळपास दर तीनपैकी दोन स्मार्टफोन युजर्स स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी आपल्या जवळच्या मोबाइल स्टोअरमध्ये जातात. त्यामुळे कोणत्याही ब्रॅण्डने भारतात यशस्वी व्यवसाय उभा करण्यासाठी आपली ऑफलाइन रिटेल उपस्थिती अधिकाधिक मजबूत व उत्तरोत्तर विकसित करण्यासाठी गुंतवणूक करत राहणे आवश्यक आहे. ग्रामीण भारतातील ग्राहकांना उत्पादनातील मूल्य महत्त्वाचे वाटते, त्यांच्या महत्त्वाकांक्षा अनेक आणि मोठय़ा असतात. त्यांना दुकानात जाऊन खरेदी करणे जास्त सहज, सोपे आणि भरवशाचे वाटते. कारण दुकानात गेल्यावर उत्पादने प्रत्यक्ष पाहता येतात, त्यांचा समक्ष अनुभव घेता येतो व पूर्ण खात्री पटल्यावरच खरेदी करायची की नाही याचा निर्णय घेता येतो. सगळय़ात महत्त्वाची बाब म्हणजे रिटेल टचपॉइंट्स अर्थात रिटेल दुकाने त्या त्या ब्रॅण्डचा चेहरा बनतात, एखाद्या ब्रॅण्डच्या दुकानामध्ये आल्यावर ग्राहकांना ब्रॅण्डसोबत प्रत्यक्ष संपर्क करत असल्यासारखे वाटते, उत्पादने नीट समजून घेता येतात, यामुळे ग्राहकांना ब्रॅण्डची अधिकाधिक माहिती मिळत राहते, याचमुळे रिटेल दुकानांमध्ये स्मार्टफोन्सच्या खरेदीला चालना देण्यात त्यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. आयटेलच्या अहवालानुसार ७९ टक्के ग्राहकांनी नवीन स्मार्टफोन परिचित व्यक्तीकडून तर ७७ टक्के ग्राहकांनी दुकानदाराकडून सुचवल्या जाणाऱ्या मोबाइलवर विश्वास असल्याचे म्हटले आहे. आज ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये होत असलेल्या स्मार्टफोनच्या प्रसारामध्ये एक लक्षणीय बदल घडून आला आहे, तो म्हणजे किफायतशीर डिव्हाईस इकोसिस्टीम, नवनवीन आणि ट्रेंडी वैशिष्टय़े यांना महत्त्वाचे मानणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील मिलेनियल्सच्या महत्त्वाकांक्षादेखील वाढत आहेत. बाजारपेठेच्या सखोल अभ्यासातून हाती आलेल्या निष्कर्षांच्या आधारे ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षा समजून घेणे, वितरण सक्षमता वाढवणे, बाजारपेठेच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचण्याची क्षमता विकसित करणे आणि त्याच वेळी उत्पादने व सेवा यांचा दर्जा अतिशय चांगला असणे या सर्व गोष्टी ग्रामीण भागांसारख्या ठिकाणी ग्राहकांची मने जिंकण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. स्थानिक पातळीवर काय चालते, काय आवडते त्यानुसार विशिष्ट लक्ष्य डोळय़ासमोर ठेवून विस्तार करणे, किफायतशीर किमतींना आकर्षक उत्पादने व सेवा प्रस्तुत करणे आणि ग्रामीण भागातील मिलेनियल पिढीला ज्या प्रकारची वैशिष्टय़े हवी आहेत किंवा भविष्यात आवडतील याचा अभ्यास करून त्यांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. भारतातील ग्रामीण बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रिटेल दुकानदारांनी विशिष्ट भौगोलिक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत दीर्घकालीन उद्धिष्टे आखून घेतली पाहिजेत, किमतींबाबत अनोखी धोरणे निश्चित केली पाहिजेत आणि ग्राहकांना आपल्या दुकानाविषयी विश्वास वाटेल असे भावनिक नाते निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. सारांश असा की, ग्रामीण बाजारपेठेमध्ये यशस्वी कारकीर्द निर्माण करायची असेल तर ब्रॅण्डने त्या बाजारपेठेमध्ये आपले पाय घट्ट रोवणे आवश्यक आहे. (लेखक ‘ट्रांसियान इंडिया’चे सीईओ आहेत.)