बाळकृष्ण कवठेकर – lokrang@expressindia.com

‘अस्तित्वाची शुभ्र शिडे’ हा डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा नवा कथासंग्रह. विशेषत: दीर्घकथालेखक म्हणून सर्वज्ञात असणारे डॉ. कोत्तापल्ले यांचा हा संग्रह त्यांच्या लौकिकास साजेसा आहे. ‘जैत्रपाळाचा धर्म’ या कथेसह कोत्तापल्ले यांच्या एकूण सात दीर्घ म्हणता येतील अशा कथा या संग्रहात आहेत. एखादा अपवाद सोडल्यास या सर्व कथांना सामाजिकतेचा संदर्भ असून, त्याच्या ठळक दर्शनासह या कथा लक्षणीय व यशस्वी ठरलेल्या आहेत. दीर्घकथा असूनही त्यांची वाचनीयता कुठेही कमी होत नाही, हाही या कथांचा आणखी एक विशेष. या कथांतून येणारे तपशील अर्थपूर्ण असल्यामुळे स्वाभाविकपणेच या कथांची गुणवत्ता वाढवणारे ठरले आहेत. समीक्षक डॉ. विलास खोले यांची या संग्रहाला लाभलेली विस्तृत आणि विश्लेषक प्रस्तावना ही आणखी एक जमेची बाजू म्हणावी लागेल. ही प्रस्तावना सर्व कथांचे यथायोग्य विश्लेषण तर करतेच, पण वाचकांना या कथांच्या आकलनाच्या दृष्टीनेही मोलाचे सहाय्य करते.

Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार

मानवी मनातील अपप्रवृत्तींचे समर्थपणे चित्रण करणे आणि त्याद्वारे या अपप्रवृत्तींवर अप्रत्यक्षपणे प्रहार करणे हे यातील सर्व कथांचे समान वैशिष्टय़ आहे. त्यामुळे या कथा वाचकांच्या सदसद्विवेकबुद्धीला जागवणाऱ्या आणि मानवी जीवनाकडे मूल्यविवेकाने पाहिले पाहिजे असे सूचित करतात. लेखक कथाविषय झालेल्या कोणा एकाचा पक्ष घेत नाही हे खरे; पण वाचकांनी यासंदर्भात कोणाचा पक्ष घेतला पाहिजे याचे सूचन करण्याचे मात्र ते टाळत नाहीत. असे केल्याने कथालेखन बोधप्रद ठरण्याची शक्यता असते, ती मात्र डॉ. कोत्तापल्ले यांनी कौशल्याने टाळली आहे.

‘अस्तित्वाची शुभ्र शिडे’ आणि ‘जैत्रपाळाचा धर्म’ यांसारख्या कथांना अद्भुतता आणि गूढता यांचा किंचितसा स्पर्श झालेला दिसतो. पण अशा कथांचे प्रमाण कोत्तापल्ले यांच्या लेखनात अत्यल्पच आहे असे म्हणावे लागेल. ‘अस्तित्वाची शुभ्र शिडे’ या कथेचे बीजच अद्भुततेकडे झुकणारे आहे. तीर्थयात्रेला गेलेली मंडाबाई ही वृद्ध स्त्री. उज्जनमध्ये प्रवासी कंपनीच्या बसमध्ये तिला ठरलेल्या वेळेत येऊन पोहोचणे शक्य होत नाही. बस तिला न घेताच निघून जाते आणि मंडाबाई उज्जनमध्येच राहते. यात्रा कंपनीबरोबर यात्रेसाठी गेलेली मंडाबाई परत आली नाही, तिची बराच काळ वाट पाहूनही ती परत येत नाही, असे पाहून तिचा पुतण्या पोपटशेट तिची मालमत्ता बळकावण्याच्या स्वार्थापोटी ती मृत्यू पावली आहे असे सर्वाना सांगतो. तिचे क्रियाकर्मही करतो आणि सगळ्या लोकांना तिच्या चौदाव्याचे गोड जेवण घालतो. त्याच्या पंगती उठत असतानाच नेमकी मंडाबाई पंगती चालू असलेल्या ठिकाणी येते. तिला पाहताच स्तिमित झालेले लोक ‘भूत..भूत’ असे ओरडत उठतात. पंगतीची पांगापांग होते. सगळीकडे एकच गोंधळ उडतो. तेव्हा पोपटशेट मंडाबाईला तिचे अस्तित्व- म्हणजे ‘ती मंडाबाईच आहे’ हे- सिद्ध करण्यास सांगतो. मंडाबाई निर्धाराने, अनेक शंकाकुशंकांना तोंड देऊन आपणच मंडाबाई आहोत हे लोकांना पटवून देते. हताश झालेला पोपटशेट तिची क्षमा मागून तिला घरी घेऊन जातो. डॉ. कोत्तापल्ले यांनी ही कथा परोपरीने फुलवून रोचक तर बनवली आहेच, पण माणसाचा स्वार्थ त्याला कोणत्या टोकापर्यंत घेऊन जातो हेही प्रत्ययकारीतेने दाखवले आहे. पोपटशेट या व्यक्तीचे मन आणि सर्वसामान्यपणे समाजाची मानसिकता या दोन्हीचे उत्तम दर्शन या कथेमध्ये होते. कोत्तापल्ले यांच्या ‘उत्तम जमलेल्या’ कथांमध्ये या कथेची गणना अवश्य करावी लागेल.

‘जैत्रपाळाचा धर्म’ ही अशीच आणखी एक उल्लेखनीय कथा. राजा जैत्रपाळ हा समाजात साधुसंत म्हणून ओळखले जाणारे लोक गरवर्तन करून सर्वसामान्य लोकांना फसवतात हे लक्षात आल्यावर अशा दांभिक साधूंना तुरुंगात टाकतो. ही गोष्ट पर्वतरांगांतील एका गहन गुहेमध्ये वर्षांनुवष्रे तप:साधना करणाऱ्या मुकुंदमुनींच्या कानावर अनेकांकडून पडते. हे लोक मुकुंदमुनींना बंदिस्त असलेल्या साधुसंतांना सोडविण्याची विनंती करतात. ती मान्य करून मुकुंदमुनी राजा जैत्रपाळाकडे जातात. तेव्हा त्यांना समजते की, राजाने या साधुसंतांना ‘ब्रह्म दाखवा’ अशी विनंती केली होती आणि ती त्यांना शक्य न झाल्यामुळे राजाने त्यांना तुरुंगात टाकले आहे. येथे डॉ. कोत्तापल्ले (आणि या संग्रहाला प्रस्तावना लिहिणारे डॉ. विलास खोले) यांची एक चूक झालेली आहे. ती म्हणजे ‘आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ब्रह्म हे निर्गुण निराकार असून, ते कोणालाही न दिसणारे असे आहे, हे त्यांनी लक्षात घेतलेले नाही. त्यामुळे राजा जैत्रपाळ याची मागणीच अवास्तव व अशक्यकोटीतील ठरते आणि त्यामुळे राजाने त्यासाठी साधुसंतांना तुरुंगात टाकणे समर्थनीय ठरू शकत नाही. ही बाब सोडली तर ही कथा जीवनातील ‘जे जे उद्दात, उन्नत आणि पवित्र’ आहे त्याचा पुरस्कार करणारी आणि पाप व पापी माणूस या दोघांचाही विरोध करणारीच आहे. मुकुंदमुनी राजाला ब्रह्म दाखवण्याचे आव्हान स्वीकारतात आणि राजाला घेऊन त्यांची गुहा असलेल्या पर्वतरांगांकडे निघतात. वाटेत एका अत्यंत निसरडय़ा उतारावरून जात असताना राजाच्या घोडय़ाचा पाय घसरतो आणि तो घोडय़ासह एका खोल दरीत कोसळतो. त्यांचे पुढे काय होते हे कोणालाच कळत नाही. ते एक गूढ बनून राहते.

इथे डॉ. कोत्तापल्ले यांच्या या कथांचा एक विशेष नोंदवणे योग्य होईल. तो म्हणजे कोत्तापल्ले यांच्या या संग्रहातील बहुतेक कथा ‘बहुमुखी’ (स्र्ील्लील्लीि)ि आहेत. वाचकांनी आपापल्या क्षमतेप्रमाणे त्यांचा अर्थ लावावा अशी कदाचित लेखकाची अपेक्षा असावी. ती रास्तच आहे. त्यामुळे कोत्तापल्ले यांच्या या संग्रहातील कथांना आणखी एक महत्त्वाचे परिमाण प्राप्त झाले आहे.

या दोन कथांप्रमाणेच त्यांच्या या संग्रहातील अन्य कथांनाही सामाजिक संदर्भ आहेत. प्रामुख्याने व्यक्ती आणि समाज यांच्यातील सत् प्रवृत्ती आणि असत् प्रवृत्ती यांच्यातील संघर्ष असा हा संदर्भ आहे आणि या संघर्षांत बहुतेक वेळा सत् प्रवृत्तींचा पक्ष घेत असल्याचे लेखक सूचित करतात. तर काही वेळा हा निर्णय ते वाचकांवरही सोपवतात, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

सत्याला आणि ते सांगू पाहणाऱ्या व्यक्तीलाही झुंडशक्तीपुढे नमावे लागणे, वाढत्या आणि गरमार्गानी होणाऱ्या शहरीकरणामुळे एका गावाचे अस्तित्वच पुसले जाणे, आपल्या तरुण मुलाला राजकारणात पक्केपणाने उभे करण्यासाठी त्याच्या वडिलांनी लाखो रुपये खर्चून एक मेळावा घेण्याचा घातलेला घाट आणि नेमक्या त्याच दिवशी शहरातील एका वयोवृद्ध, परंतु समाजात आदराचे स्थान असणाऱ्या लोकाग्रणीच्या झालेल्या मृत्यूमुळे तो उधळला जाणे व त्यामुळे त्या तरुणाच्या वडलांचा तडफडाट होणे अशा प्रकारच्या घटना, प्रसंग आणि मानसिकता यांनी युक्त अशा या संग्रहातील इतर कथाही उत्कंठावर्धक आणि सामाजिक अपप्रवृत्तींचे भेदक चित्रण करणाऱ्या व म्हणूनच वाचनीयही ठरलेल्या आहेत.

काही वेळा तपशील देण्याच्या अतिरेकामुळे कथेची बांधणी सलसर होणे, कथेच्या पुढील वाटचालीचा अंदाज ती वाचण्यास सुरुवात करतानाच येणे- म्हणजेच कथारचनेत कृत्रिमता तथा योजनापूर्वकता येणे असे काही दोष या कथांमध्ये आढळतात. तरीही एकूणात पाहता या कथा समाजजीवनाचे वास्तव चित्रण करणाऱ्या, मूल्ययुक्त आणि वाचकाचे सुसंस्कृतपणाचे भान जागवणाऱ्या आहेत असे म्हणणे योग्य होईल.

‘अस्तित्वाची शुभ्र शिडे’- नागनाथ कोत्तापल्ले, लोकवाङ्मयगृह, पृष्ठे- २४०, मूल्य- ३०० रु.६