वैद्य सदानंद प्र. सरदेशमुख - ictrcpune@gmail.com भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने केंद्र सरकारच्या परवानगीने आयुर्वेदाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आधुनिक वैद्यकशास्त्रातील (अॅलोपॅथी) शस्त्रक्रियांचा समावेश करून त्यांना ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे आरोग्यसेवेत होणाऱ्या बदलांबाबत अॅलोपथी आणि आयुर्वेद अशा दोन्ही शाखांच्या विशेषज्ञांकडून आपापली बाजू मांडणारे लेख.. आयुर्वेद विद्याशाखेतील शल्यतंत्र (Surgery) व शालाक्यतंत्र (ENT-Opthalmology) विषयातील पदव्युत्तर एम. एस. पदवीधारकांना २० नोव्हेंबर २०२० च्या भारताच्या राजपत्रात शस्त्रकर्म करण्याचा अधिकार प्राप्त झाला आणि त्यावर साधकबाधक चर्चा सुरू झाल्या. भारतासारख्या विकसनशील आणि ग्रामीण दुर्गम भागांत अधिक लोकसंख्या असलेल्या देशात आजवर आयुर्वेद व होमिओपॅथीच्या पदवीधारकांनी वैद्यक क्षेत्रात दिलेले योगदान, शहरांतील बहुतांशी अॅलोपॅथिक रुग्णालयांत आय. सी. यू.मध्ये हाऊसमन, आर. एम. ओ. म्हणून चोख कामगिरी बजावत असलेले तसेच कोविड संक्रमणात जिवावर उदार होऊन रुग्णसेवा करणारे बी. ए. एम. एस. डॉक्टरांच्या ज्ञानावर व कार्यनिपुणतेवर या चच्रेमुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले. अशा वेळी वाघोली येथे आयुर्वेद महाविद्यालय, आयुर्वेद रुग्णालय, आयुर्वेदिक फार्मसी व इंटीग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अॅण्ड रिसर्च सेंटरचा गाठीशी असलेला अनुभव व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुर्वेदावर निष्ठा ठेवून आयुर्वेदाची चिकित्सा करण्याची मिळालेली संधी या अनुषंगाने सध्याच्या या चíचत विषयाचे शास्त्रीयदृष्टय़ा अवलोकन करावेसे वाटले. बी. ए. एम. एस. पदवीनंतर ‘एम. एस.’ शल्यतंत्र व शालाक्यतंत्र हा पदव्युत्तर अभ्यासक्रम १९७९ मध्ये सुरू झाला. भारतीय चिकित्सा पद्धतींमधील २०१६ च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शल्य व शालाक्यतंत्रातील शस्त्रकर्माबाबत नियमावलीचे सदर राजपत्र हे विस्ताराने मर्यादा निश्चित करणारे पत्रक आहे. यात आयुर्वेदाच्या शल्य-शालाक्य विषयांतील पदव्युत्तर वैद्यांना जी प्राथमिक स्वरूपाची शस्त्रकर्म करण्याची परवानगी दिली गेली आहे त्यांची नावे नमूद केलेली आहेत. आजपर्यंत असे अनेक वैद्य शल्य-शालाक्याचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन, तज्ज्ञ शल्यतंत्रज्ञांकडे शस्त्रकर्माचा अनुभव घेऊन स्वतंत्रपणे शल्यकर्म करीत आहेत. सदरच्या भारताच्या राजपत्रात शल्य-शालाक्य विषयातील पदव्युत्तर पदवीधारकांना जी शस्त्रकर्मे करण्यास परवानगी मिळाली आहे, त्या सर्वच शस्त्रकर्मयोग्य अवस्थांचे, त्यावरील शस्त्रकर्म व औषधी चिकित्सांचे वर्णन सुश्रुताचार्यानी पाच हजार वर्षांपूर्वीच केले आहे. आजचे आधुनिक वैद्यकशास्त्रही सुश्रुताचार्याना शल्यतंत्राचे जनक मानते. केवळ आयुर्वेदाच्या शल्य-शालाक्य तंत्रातील पदव्युत्तर पदवीधारकांनीच नव्हे, तर अॅलोपॅथिक सर्जन्सनीही प्रत्यक्ष शस्त्रकर्माची प्रॅक्टिस सुरू करण्यापूर्वी सुश्रुतसंहितेची पारायणे करावी, इतके त्यातील ज्ञान सुसूत्र, र्सवकष व अचूक आहे. संहितेची रचना करताना सुरुवातीच्या अध्यायांतच शल्यतंत्र करण्यास योग्य व्यक्तीच्या अंगी कोणते गुण असावेत व कोणते दोष नसावेत याचे वर्णन केलेले आहे. त्यानंतर यंत्रविधी व शस्त्रावचारणीय अध्यायांत शल्यतंत्रज्ञाचा आत्मा असलेल्या यंत्र व शस्त्रांचे सविस्तर वर्णन केलेले आहे. आजच्या प्रगत वैद्यकविश्वात शस्त्रकर्मासाठी उपयुक्त यंत्र व शस्त्रांच्या स्वरूपात प्रगती झाली असली तरी सुश्रुताचार्यानी शल्यकर्मासाठी वापरलेली संदंश यंत्र, स्वस्तिक यंत्र थोडय़ाफार फरकाने आजही वापरात आहेत. सुश्रुताचार्यानी वर्णन केलेले यंत्रांचे सहा प्रकार व शस्त्रांचे २० प्रकारांत या सर्व आधुनिक Surgical instruments व equipments चा समावेश होतो. सुश्रुतकालीन नाडीयंत्र परीक्षा ही नव्या जमान्यात ‘एण्डोस्कोपी’ या पद्धतीने विकसित झाली असून, त्यामुळे चिकित्सेत क्रांतिकारी फरक पडला आहे. या यंत्र-शस्त्रांचे दोष, यंत्र-शस्त्रांची काळजी कशी घ्यावी याचेही सविस्तर वर्णन सुश्रुताचार्यानी केले आहे. शल्य-शालाक्य तंत्राचा अभ्यास व प्रत्यक्ष कर्म करण्यासाठी प्रथम छेदन-भेदनादी कर्म फळ, फूल, भोपळा, मृत शरीर अशा निर्जीव वस्तूंवर करून निपुणता मिळवावी व नंतरच रुग्णांवर शस्त्रकर्म करावे असा सावधगिरीचा इशाराही सुश्रुताचार्यानी दिला आहे. ‘Practice makes man perfect’ हे सूत्र सुश्रुताचार्यानी शल्यतंत्रज्ञांना आवर्जून सांगितले आहे. सूत्रस्थानाच्या आठव्या अध्यायातील २०व्या श्लोकात- ‘प्रयोगज्ञस्य वैद्यस्य सिद्धि:भवति नित्यश:। तस्मात् परिचयं कुर्यात शस्त्राणां आदित: सदा।।’ शस्त्र कसे धरावे याचा अभ्यास म्हणजे सतत प्रयोग करावा असा स्पष्ट उल्लेख आहे. अशा प्रकारे संहितेच्या सुरुवातीलाच शल्यतंत्रज्ञाला सुफल शस्त्रकर्मासाठी मार्गदर्शक धडे दिले आहेत. कोणत्याही शल्यतंत्रात रक्तस्त्राव अधिक होऊ नये ही काळजी घेणे आवश्यक असते. रक्ताचे जीवधारणेतील अनन्यसाधारण महत्त्व जाणून सुश्रुताचार्यानी सूत्रस्थानातच प्राकृत रक्ताचे गुण, विकृत रक्ताचे दोष, अतिरक्तस्त्रावाची चिकित्सा आदी रक्ताचे सविस्तर वर्णन करणारा शोणितवर्णनीय अध्याय सांगितला आहे. रक्तविस्त्रावण म्हणजे दूषित रक्ताचे निर्हरण करणे ही आयुर्वेदात रक्तदुष्टीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधींची चिकित्सा सांगितली आहे. जलौकावचारण (Leech) ही त्यासाठी सर्वश्रेष्ठ पद्धत आहे. याचे महत्त्व जाणून आज परदेशातही Leech Therapy देणाऱ्या अकॅडमी आहेत. व्रण म्हणजे बोलीभाषेत जखम. जी निज म्हणजे शरीरातील विकृतीमुळे होते अथवा आघातामुळे होते. शल्यतंत्रामधील व्रणाचे महत्त्व जाणून सुश्रुताचार्यानी व्रणाचे स्वरूप, प्रकार, साध्यता-असाध्यता, दुष्टव्रण, व्रणाचे ६० उपक्रम, व्रणाची छेदन-भेदन-लेखन इत्यादी आठ प्रकारच्या शस्त्रकर्माचे विस्ताराने व प्रचलित शस्त्रकर्मातील wound managementशी तंतोतंत जुळणारे वर्णन केले आहे. अशा प्रकारे सुश्रुताचार्याच्या काळात व्रणकर्म करण्यासाठी वापरात असलेली पद्धती वैशिष्टय़पूर्ण होती. सीवनकर्मासाठी ज्या पद्धतीची जखम असेल त्यानुसार टाके घातले जात. उदा. सुश्रुतोक्त अनुवेल्लित याच पद्धतीने आज इंटरप्टेड, िस्टग असे सीवनकर्म (टाके) केले जाते. अर्श (मूळव्याध), अश्मरी (मूतखडा), भगंदर, विद्रधी (गळवे), स्तनरोग, ग्रंथी, अर्बुद यासारख्या शस्त्रकर्म चिकित्सा करण्यास योग्य व्याधींचे व त्यांच्या शस्त्रकर्माचे सुश्रुतसंहितेत निदान व चिकित्सास्थानात वर्णन केलेले आहे. भगंदरासाठी ‘क्षारसूत्र’ ही सुश्रुतोक्त चिकित्सा पद्धती पुन्हा नव्याने लोकप्रिय होऊ लागली आहे. अस्थिभग्नाचे प्रकार, त्याची चिकित्सा, बंध; उंदीर-िवचू-कीटक यांच्या दंशाची चिकित्सा यांचेही सविस्तर वर्णन केले आहे. कान-नाक-घसा व नेत्रविकार (ENT व Opthalmology) यांचा सुश्रुत संहितेत शालाक्यतंत्रात समावेश केला आहे. अतिशय सूक्ष्म शलाकांच्या साहाय्याने या विकारांची चिकित्सा करावी लागते म्हणून यास ‘शालाक्यतंत्र’ म्हटले आहे. सुश्रुताचार्यानी उत्तरतंत्रात ६५ मुखरोग, ७६ नेत्ररोग, २८ कर्णरोग, ३१ नासारोग व ११ शिरोरोगांचे वर्णन व त्यांची चिकित्सा सविस्तर सांगितली आहे. त्यातही नेत्ररोगांसाठी १९ अध्याय असून त्यात प्रथम नेत्राच्या शरीराचा (Anatomy) उल्लेख आहे. सुश्रुतोक्त नासा भागातील फ्लॅस्टिक सर्जरी आजही सर्रास वापरात आहे. शरीररचनेचा (Anatomy) अभ्यास हा शल्य-शालाक्य तंत्रज्ञांना अवश्यभावी असल्याने सुश्रुतसंहितेत शारीरस्थानात अस्थी- संधी- स्नायू- पेशी- मांसरज्जू- सिरा- धमनी यांचे वर्णन असून, या अभ्यासासाठी शवविच्छेदन (Dissection) करण्याची त्या काळात शक्य असलेली पद्धतही वर्णिली आहे. सुश्रुतोक्त शल्यतंत्रातील मूलभूत तत्त्वांचा अभ्यास करून आणि बदलत्या कालानुरूप शस्त्रकर्माच्या पद्धतींमध्ये आलेली आधुनिकता आत्मसात करून आयुर्वेदाच्या शल्यतंत्रज्ञांनी केलेली शस्त्रकर्मे निश्चितच रुग्णांना दिलासा व नवजीवन प्राप्त करून देत आहेत. यासाठी आयुर्वेदाच्या शल्य-शालाक्य तंत्रज्ञांनी आपल्या क्षेत्रातील नावीन्याची कास धरून, शास्त्राभ्यास करून तज्ज्ञ शल्यतंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर अनुभव घेणे आवश्यक आहे. ‘अभ्यासात् प्राप्यते दृष्टी’ हे सूत्र आयुर्वेदानेच सांगून ठेवले आहे. वाघोली येथील आमच्या समन्वयात्मक कॅन्सर चिकित्सा व अनुसंधान प्रकल्पात गेली २६ वर्षे आधुनिक वैद्यकातील कॅन्सर सर्जन, केमोथेरपिस्ट, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट व कॅन्सर संशोधक आणि आयुर्वेदिक कॅन्सर तज्ज्ञ रुग्ण हा चिकित्सेचा केंद्रिबदू मानून रुग्णांना अॅलोपॅथिक व आयुर्वेदिक अशी समन्वयात्मक चिकित्सा देत आहेत. यात दोनही पॅथींतील कॅन्सरच्या चिकित्सा-तत्त्वांची व रुग्णानुभवाची दोनही पॅथींतील डॉक्टर व वैद्यांत आदानप्रदान होत असल्याने अंतिमत: कॅन्सरग्रस्त रुग्णांची जीवनाची गुणवत्ता सुधारणे, व्याधिप्रतिकारशक्ती व आयुर्मान वाढणे आणि कॅन्सर आटोक्यात राहणे हे फलित दिसून आले आहे. चरक व सुश्रुताचार्यानी कॅन्सरशी साधम्र्य असलेल्या दुष्ट व्रण-ग्रंथी-अर्बुदादींचे वर्णन केले आहे. तरीही बायोप्सीच्या साहाय्याने कॅन्सरचे निदान निश्चित झाल्यावरच कॅन्सरची आयुर्वेदाच्या दृष्टीने चिकित्सा केली जाते. आयुर्वेदाने शस्त्रकर्म-क्षारकर्म व अग्निकर्म ही दुष्ट व्रण-ग्रंथी-अर्बुदादींची प्रधान चिकित्सा सांगितली आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रातही कॅन्सर व्याधीची चिकित्सा शस्त्रकर्म, केमोथेरपी व रेडिओथेरपी अशी सांगितली आहे. एकूणच शास्त्राभ्यास व प्रत्यक्ष रुग्णानुभव यांच्या साहाय्याने आधुनिक वैद्यकशास्त्रातील व आयुर्वेदातील शल्य-शालाक्य तंत्रज्ञांनी सहकार्याने आपल्या देशवासीयांच्या आरोग्यसेवेच्या कार्यात सहभागी होणे ही काळाची गरज आहे. (लेखक आयुर्वेद चिकित्सक व इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अॅण्ड रिसर्च सेंटरचे संचालक आहेत.)