संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या राजवटीत बोकाळलेला भ्रष्टाचार आणि त्यांनी केलेल्या घोडचुका यांचाही आमच्या पक्षाच्या निवडणुकीतील विजयात मोठा वाटा असल्याचे मत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केले.
अलीकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुका अभूतपूर्व असल्याचे सांगून अडवाणी म्हणाले की, यूपीए सरकारच्या चुकांचा वाटा आमच्या विजयात असला तरीही भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.आपण १९५२ पासूनच्या निवडणुका पाहिल्या आहेत, मात्र २०१४ च्या निवडणुका अभूतपूर्व होत्या, निवडणुकीचा निकाल अशा प्रकारे कधीही लागला नव्हता. कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम केले, असेही अडवाणी म्हणाले.
तथापि, आमच्या विजयात विरोधी पक्षांचा मोठा वाटा आहे. यूपीए सरकारच्या राजवटीत इतक्या मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाला नसता, अथवा त्यांनी इतक्या मोठय़ा प्रमाणावर चुका केल्या नसत्या तर कदाचित निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता, असेही अडवाणी म्हणाले.