तूर, मूग, उडीद पेरणी व माशगत - मानवी आहारात कडधान्ये महत्त्वाची आहेतच, शिवाय ही पिके हवेतील नत्र घेऊन त्याचे जमिनीत स्थिरीकरण करतात. यांचा जमिनीवर पडणारा पाला जमिनीची सुपीकता वाढविण्यास व जमिनीची धूप थांबविण्यास उपयुक्त ठरतो. महाराष्ट्रात खरीप हंगामातील तूर, मूग व उडीद ही प्रमुख कडधान्ये होत. भारतातील तूर व मूग या पिकांखालील एकूण क्षेत्रापैकी २४ ते २५ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. परंतु एकूण उत्पादनातील महाराष्ट्राचा वाटा २२ ते २३ टक्के इतकाच आहे. उडीद पिकाखालील भारतातील एकूण क्षेत्राच्या १७ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. हवामान - या पिकांना समशीतोष्ण हवामान योग्य ठरते. जास्त थंडी मानवत नाही. जमीन - विविध प्रकारच्या जमिनीत ही पिके घेता येतात. तथापि, मध्यम ते भारी जमीन या पिकांसाठी सुयोग्य ठरते. क्षारयुक्त व चोपण जमिनीत उत्पन्न कमी येते. पूर्व मशागत - एक खोल नांगरट व नंतर कुळवाच्या तीन-चार पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करणे आवश्यक असते. पेरणी - मूग व उडीद या पिकांची पेरणी मृगाचा पहिला पाऊस पडल्यावर आणि जमिनीत पुरेशी ओल आल्यावर करतात. जूनचा दुसरा पंधरवडा पेरणीसाठी योग्य ठरतो. तूर पिकाची पेरणी चांगला पाऊस झाल्यावर जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ात करतात. पेरणीस उशीर झाल्यास उत्पन्न घटते.