मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खळबजनक आरोपांमुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाने या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेत, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना आज(सोमवार) काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट केली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, ”चौकशच्याबाबतीचा निर्णय झालेल नाही तर तसा विषय येतो कुठं? आम्ही या विषयात इतकं पुढं गेलोच नाही, एक पत्र आणि लगेच त्या मंत्र्याची चौकशी असं कसं होऊ शकतं? भाजपा शेवटी विरोधी पक्षात आहे, सत्ता नसल्यामुळे ते अस्वस्थ आहेत. त्यांचा सतत प्रयत्न सुरू असतो, जी गोष्ट घडली त्यावरून वातावरण निर्माण करण्याकरता त्यांना संधी वाटत आहे. फक्त सत्तेसाठी चाललेला त्यांचा प्रयत्न आहे. काही प्रश्न असे आहेत की ज्याचं उत्तर मी देण्याची आवश्यकता नाही, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेले आहेत, त्यांनीच माहिती देणं योग्य आहे.”

तसेच, ”राज्यात कायदा सुव्यवस्था निर्माण झाला आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही, कारण युती सरकारच्या काळात फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी, अनेक प्रश्न निर्माण होत होते. आम्ही तर सांगितलेलं आहे की, परमबीर सिंग यांचं पत्र देखील कुठंतरी दबावातून त्यांनी असं केलेलं दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेवर आम्ही बोललं पाहिजे असं नाही. आम्ही तिन्ही पक्षांचे नेते अजून एकत्र बसलेलो नाही, आमची एकत्र चर्चा होणार आहे. कुठंतरी षडयंत्र रचलं जात आहे, असं आम्हाला वाटतं.” असं देखील थोरात यांनी बोलून दाखवलं.